बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता गोविंदा. गोविंदाने त्याच्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज केले आहे. मात्र सध्या तो त्याच्यात आणि अभिनेता कृष्णा अभिषेकमधील सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आला आहे. असे म्हटले जाते की कृष्णा आणि गोविंदामधील हा वाद कृष्णाची पत्नी कश्मीरामुळे सुरू झाला. या दोघांमधील या वादाला आता एक वर्ष झालं असून या भांडणात ते कमी आणि त्यांच्या पत्नीच नेहमी बोलताना दिसतात. दोघांमध्ये सुरू असलेल्या या वादावर आता कृष्णाची बहीण आरती सिंहने ही तिचे मत मांडले आहे.

‘बिग बॉस १३’ लोकप्रिय स्पर्धक अभिनेत्री आरती सिंह ही नेहमीच चर्चेत असते. आरती सिंह ही कृष्णा अभिषेकची बहीण आणि गोविंदाची भाची आहे. मात्र कृष्णा आणि गोविंदामध्ये सुरू असलेल्या वादामुळे आरतीचे नुकसान होतं आहे असे तिने सांगितले. ‘इंडियान एक्सप्रेस’ शी बोलताना आरती म्हणाली, “त्यांच्यामध्ये जो काही वाद झाला त्याचा परिणाम माझ्यावर देखील झाला आहे. मला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. कारण या वादामुळे चीची मामाचे कुटुंबिय माझ्याशी पण बोलत नाहीत.”

पुढे जेव्हा आरतीला विचारण्यात आले की तू कधी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला नाहीस का? यावर उत्तर देताना तिने सांगितले की, “मी अभिषेकशी बोलले होते. मात्र आता चीची मामा माफ करतील का नाही हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. दोघेही काहीना काही बोलले आहेत पण शेवटी आम्ही एक फॅमिली आहोत आणि मी हिच आशा करते की हे वाद लवकर संपुदेत आणि पुन्हा पहिल्या सारखे सुरळीत होऊ देत.”

कृष्णा आणि गोविंदा मधील हा वाद कृष्णाची पत्नी कश्मीराच्या एका ट्वीटवरुन सुरू झाला. त्यामुळे गोविंदा आणि कृष्णामधील संबंध खराब झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं सोडून दिलं. एव्हढचं नव्हे तर गोविंदा जेव्हा द कपिल शर्मा शोमध्ये जेव्हा गोविंदा आला होता त्या भागासाठी कृष्णा अभिषेकने काम करण्यास नकार दिला माहिती आहे.