सध्या अभिनय क्षेत्रात बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असा वाद सुरू आहे. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून आता या वादावर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड कलाकारांबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ यासारखे चित्रपट देणारे प्रकाश झा सध्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत.

दिग्दर्शक प्रकाश झा यांना ‘दामुल’ आणि ‘सोनल’ या चित्रपटांसाठी २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ४ दशकांपेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टीत असलेल्या प्रकाश झा यांनी आतापर्यंत अजय देवगण, शबाना आझमी, माधुरी दीक्षित, ओम पुरी, नाना पाटेकर आणि रणबीर कपूर यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे आणि त्यांच्या मते बॉलिवूड कलाकारांना अभिनय येत नाही.

आणखी वाचा-“तो बॉलिवूडबद्दल बोलला ते बरोबरच…” कंगना रणौतचा महेश बाबूला पाठिंबा

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, Goafest 2022 मध्ये बोलताना प्रकाश झा यांनी बॉलिवूड कलाकारांच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, “मला या कलाकारांसोबत काम करताना चीड येते. त्यांना माहीतच नाही की अभिनय काय असतो आणि कशाबद्दल असतो. आजपर्यंत कोणत्याही कलाकाराने मला ना शूटिंगच्या दिवसांबद्दल विचारलं ना कधी शूटिंगची वेळ काय आहे याबाबत विचारणा केली किंवा लोकेशन कोणती आहेत, अॅक्शन सीक्वेन्स कसे असणार आहेत आणि बरंच काही. पण कोणत्याही कलाकाराने मला हे विचारलेलं नाही.”

प्रकाश झा पुढे म्हणाले, “बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांमध्ये हाच मोठा फरक आहे. हॉलिवूडमध्ये कलाकार वर्कशॉपसाठी जातात, सराव करतात, आपला अभिनय सुधारण्याचा प्रयत्न करतात. मी देखील अनेक माझं अभिनय कौशल्य सुधारण्यासाठी वर्कशॉप अटेंड केली आहेत. मी शांतपणे एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे वर्कशॉपमध्ये सहभागी होत असे. अशाप्रकारे मी अभिनेत्याची भाषा समजून घेतली. मी क्लासमध्ये शेक्सपिअर आणि अन्य नाटकांमध्ये परफॉर्म केलं. ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला.”

आणखी वाचा- “बलात्कार म्हणजे सरप्राइज सेक्स…” जेव्हा सनी लिओनीचं ट्वीट ठरलं होतं वादग्रस्त, वाचा नेमकं काय घडलं

प्रकाश झा यांनी दिग्दर्शन केलेला अखेरचा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचं नाव ‘परीक्षा- द फाइनल टेस्ट’ असं होतं. जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी ते ‘सांड की आंख’ चित्रपटात दिसले होते. त्यानंतर २०२०मध्ये त्यांनी बॉबी देओलला घेऊन ‘आश्रम’ वेबसीरिज बनवली. ज्याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.