बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने अंतिमच्या संपूर्ण टीमने द कपिल ‘द कपिल शर्मा शो’ या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी कपिल हा सर्व कलाकारांसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. मात्र या दरम्यान आयुषने त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सलमानही दोन मिनिट शांत बसला. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. या शो मध्ये नेहमीच विविध कलाकार हजेरी लावतात. येत्या भागात 'अंतिम' चित्रपटाची टीम या शोमध्ये हजेरी लावणार आहे. नुकतंच याचा प्रोमो 'सोनी टिव्ही'ने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत कपिल शर्माने आयुषला सलमानबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर आयुषने सलमानसोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. यावेळी सलमान त्याच्या मेहुण्यावर कशाप्रकारे संतापला, असे त्याने सांगितले. या व्हिडीओत कपिलने आयुषला प्रश्न विचारला की, "तू आणि सलमान दोघेही एकाच कुटुंबातील आहात, एकत्र बसता…पण हेच सेटवर असताना तुला किती फरक जाणवतो?." त्यावर आयुष म्हणाला, "फारच जास्त. आम्ही दोघं एकमेकांना दर दोन दिवसांनी भेटतो आणि मजा मस्ती करुन परत घरी येतो," असे त्याने सांगितले. त्यापुढे तो म्हणाला, "एकदा अर्पिता कामानिमित्त बाहेर गेली होती आणि मी असंच सलमानला भेटायला गेलो होतो. मात्र सलमान मला बघताच म्हणाला, तू विचित्र माणूस आहेस. तू प्रत्येकवेळी घरी का येतोस?" असे आयुषने सांगितले. त्यानंतर सलमान जोरजोरात हसू लागला. दरम्यान हा संपूर्ण प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.