रेश्मा राईकवार 

भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ राहून हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्याचा लौकिक मिळवणं हे कल्पनेतही सोपं नाही. प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणणं हे आव्हान ‘ओटीटी’सारख्या नव्या माध्यमाने काही प्रमाणात कमी केलं आहे. ओटीटी माध्यमातून प्रदर्शित झालेला चित्रपट मोठय़ा संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे कलाकाराला वैविध्यपूर्ण भूमिकांची संधीही मिळते, हे या माध्यमावर सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या अभिनेता मनोज वाजपेयी यांचं म्हणणं आहे. मात्र तरीही याबाबतीत कोणा एका माध्यमाची मक्तेदारी नको. ओटीटी आणि चित्रपटगृह दोन्हीकडे चित्रपट चालले तरच खऱ्या अर्थाने चांगली आशयनिर्मिती होईल, असं स्पष्ट मत ते व्यक्त करतात. 

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

मनोज वाजपेयी यांच्या ‘भोसले’ या सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘द फॅमिली मॅन’ या प्रचंड यशस्वी ठरलेल्या वेबमालिकेच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यांचा ‘गुलमोहोर’ हा आणखी एक वेगळा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला होता. आताही अशीच एक वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका असलेला ‘बंदा’ हा त्यांचा नवीन चित्रपट २३ मे रोजी ‘झी ५’वर प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना ओटीटी माध्यमामुळे आपल्याला मिळालेल्या यशाचा उल्लेख करतानाच चित्रपटगृहांची व्यवसायवृद्धीही तितकीच गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या नावाने प्रदर्शित होणारा मनोज वाजपेयी यांचा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित आहे. एका पाच वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसाराम बापू यांच्याविरोधात खटला लढवणाऱ्या पूनमचंद सोलंकी या वकिलाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून मनोज वाजपेयी यांनी ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.  वास्तववादी घटनेवर आधारित चित्रपटातील भूमिका निवडण्यात धोका वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना ‘बंदा’ची कथा ऐकल्यानंतर एका छोटय़ाशा गावातल्या वकिलाची मानसिकता मला महत्त्वाची वाटली, असं मनोज यांनी सांगितलं.

या वकिलाच्या हातात आलेलं प्रकरण ऐकल्यानंतर खरं तर तो शहारतो आणि तरीही न डगमगता, एक पैसा न घेता तो खटला लढवण्याचा निर्णय घेतो. ही सर्वसाधारण  गोष्ट आहे, पण या खटल्याच्या निमित्ताने त्याच्यासारखा सामान्य माणूस खूप मोठय़ा माणसांना आव्हान देतो, त्यांना विचार करायला भाग पाडतो, त्यांना हरवतो. त्याचं हे सामान्यातलं असामान्यत्व मला अधिक भावलं, असं मनोज यांनी सांगितलं. ‘आपण काही असामान्य काम करतो आहोत असा कोणताही आव न आणता अनेकदा खडतर प्रसंगांचा सामना करत आयुष्यात पुढे जाणाऱ्या व्यक्ती या त्यांच्या आयुष्यात हिरोच असतात, पण सामान्य माणसाची एक खासियत आहे की, त्यांना कधीच आपण काही महान काम केलं आहे असं वाटत नाही. या खटल्यातून पैसे मिळणार नाहीत, पण ज्याअर्थी ते प्रकरण आपल्याकडे आलं आहे त्याअर्थी या लहान मुलीला न्याय मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे असं मानणाऱ्या या वकिलाने पाच वर्ष न्यायालयात खटला लढवला. ही काही सोपी गोष्ट नाही. हा जसा या कथेतला महत्त्वाचा पैलू होता तसंच आणखी एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे मोठमोठय़ा नामांकित वकिलांसमोर उभं राहात रोज अभ्यासपूर्ण पद्धतीने दावे लढवायचे, तेही आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो ही टांगती तलवार डोक्यावर घेऊन.. इतक्या चिकाटीने हा ऐतिहासिक खटला लढवून जिंकल्यानंतर तो रातोरात लोकप्रिय झाला, त्याच्याकडे भरपूर पैसे आले असं काही झालं नाही, पण ज्यांना ज्यांना या खटल्याबद्दल माहिती आहे त्यांना गेली पाच वर्ष या वकिलाने कशा कशाला तोंड दिलं असेल, त्या छोटय़ा मुलीवर काय गुदरलं असेल याची किमान जाणीव आहे. हा जो काही भावनांचा कल्लोळ आहे तो नेमका शब्दांत मांडणं कठीण आहे. हे सगळं नेमकं काय होतं हे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे,’ असं सांगत मनोज यांनी विस्तृतपणे आपल्या भूमिकेमागचा विचार उलगडून सांगितला.

ज्या प्रकारचे चित्रपट मी करतो ते शक्यतो फार मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित केले जात नाहीत, विकत घेतले जात नाहीत. खूप मोठय़ा संख्येने प्रेक्षक हे चित्रपट पाहतात असंही नाही; पण मला वाटतं, तुम्ही सातत्याने असे चित्रपट करत राहिलं पाहिजे. तुम्हाला एक दिवस निश्चितच त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं मनोज यांनी सांगितलं.

ओटीटी माध्यमे आली आणि त्यांनी अशा प्रकारच्या चित्रपटांचं सातत्याने स्वागत केलं. लोकांनी ओटीटीवर हे चित्रपट पाहिले, त्यांना ते आवडले. ओटीटीच्या माध्यमातून आम्ही सहजपणे चित्रपट इतक्या मोठया प्रेक्षकसंख्येपर्यंत पोहोचवू शकलो आणि प्रेक्षकांनाही त्यांच्या सोईने घरच्या घरी चित्रपट पाहता आले, त्यांना त्यासाठी बाहेर चित्रपटगृहात जाण्याची गरज उरली नाही. त्यामुळे ओटीटी हा एक भक्कम पर्याय उभा राहिला आहे. मात्र ओटीटी आणि चित्रपटगृहे दोन्हींचा व्यवसाय चांगला झाला तर कोणा एका माध्यमाची मक्तेदारी उरणार नाही आणि मक्तेदारी नसेल तरच दोन्ही माध्यमांमध्ये चांगल्या आशयनिर्मितीसाठी स्पर्धा सुरू होईल ज्याचा अंतिमत: लाभ आमच्यासारख्या कलाकारांना होणार आहे.

मनोज वाजपेयी