‘पोन्नियिन सेल्वन’ फेम दाक्षिणात्य अभिनेता रवी मोहनच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. त्याचा १५ वर्षांचा संसार मोडला आहे. त्याने सहा महिन्यांपूर्वी पत्नी आरतीपासून विभक्त होत असल्याची पोस्ट केली होती. नुकताच रवी मोहन गायिका केनिशा फ्रान्सिसबरोबर एका लग्नात पोहोचला, त्यानंतर आरती सातत्याने पोस्ट करत आहे.
रवीने नुकतीच चेन्नई येथे निर्माते इशारी गणेश यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली. त्यावेळी त्याच्याबरोबर केनिशादेखील होती. या दोघांनी सोनेरी रंगाच्या आउटफिटमध्ये ट्विनिंग केलं होतं. त्यानंतर केनिशा व रवी त्यांचं नातं जाहीर करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. आरतीनेही पोस्ट करून रवीने मुलं सांभाळण्यासाठी सोडून दिल्याचं म्हटलं होतं. रवीने त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं आणि जेव्हा गरज होती तेव्हा केनिशा तिथे होती, असं तो म्हणाला होता. रवी व केनिशाची जवळीक वाढत असल्याच्या चर्चांदरम्यान आता आरतीने पोटगी मागितली आहे.
आरतीने मागितली पोटगी
अभिनेता रवी मोहन व आरती दोघे बुधवारी चेन्नई कौटुंबिक न्यायालयात हजर झाले. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. रवीने हे लग्न टिकवायचं नसल्याचं स्पष्ट केलं. तर आरतीने महिन्याला ४० लाख रुपयांची पोटगी मागितली आहे.
आधी रवी मोहनने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने जोडप्याला समेट करण्यासाठी काही सत्रांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं, त्यानुसार ते दोघे कोर्टात येत होते. २१ मे रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत, रवीने पुन्हा एकदा घटस्फोटाची विनंती केली आणि आरतीची पुन्हा एकत्र यायची याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीशांनी दोघांनाही त्यांच्या याचिकांवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आणि प्रकरणाची सुनावणी १२ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.
रवी आणि आरती यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर १५ वर्षांपूर्वी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलं आहेत. रवीने सप्टेंबर २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. मग नोव्हेंबरमध्ये चेन्नई फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

रवी मोहनची घटस्फोटाची पोस्ट
“जड अंतःकरणाने मी तुम्हा सर्वांशी एक अत्यंत खासगी अपडेट शेअर करत आहे. खूप विचार आणि चर्चा केल्यानंतर मी आरतीबरोबरचं माझं लग्न मोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही घाईने घेतलेला नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि हा निर्णयच सर्वांसाठी योग्य आहे असं वाटतंय. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आणि आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या गोपनीयतेचा आदर करा. या प्रकरणी कोणीही अफवा पसरवू नये, आरोप करू नये आणि हे प्रकरण खासगी राहू द्यावे,” अशी पोस्ट रवीने केली होती.
दरम्यान, रवीने आतापर्यंत ‘पेरणमाई’, ‘एम कुमारन सन ऑफ महालक्ष्मी’, ‘दीपावली’ आणि ‘थानी ओरुरवन’ यासह अनेक हिट चित्रपट केले आहेत. मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दोन्ही भागात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.