Sudesh Berry PM Modi Vishnu Avatar Statement: बॉलिवूड अभिनेता सुदेश बेरी यांनी नुकत्याच दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावर जहरी टीका केली आहे. पॉडकास्ट विथ अकंपनी अक्कीला दिलेल्या मुलाखतीत सुदेश बेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचे अवतार असल्याचे म्हटले. ‘मी त्यांचे पाय धुवून ते पाणी प्यायलाही तयार आहे’, असेही ते म्हणाले.

अकंपनी अक्की या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सुदेश बेरी यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, “मी या लोकांना ओळखत नाही. पण त्यांनी देशाला मागे नेण्याचे काम केले आहे. मी एजीपी, सीजीपी यांना ओळखत नाही. पण हे लोक देशाला मागे खेचत आहेत, एवढे नक्की.”

सुदेश बेरी यांनी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “तिथे (जंतर-मंतर) जमलेले सर्व निरुपयोगी लोक आहेत. देशासाठी त्यांनी काहीही योगदान दिलेले नाही. जर तुम्हाला देशाची, समाजाची सेवा करायची असेल तर मुलांसाठी उद्याने बांधा, वृद्धांसाठी आश्रम बांधा, रुग्णांवर उपचार करा. जंतर-मंतरवर बसून आंदोलन केल्याने काहीही होणार नाही.”

पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले?

“मला पंतप्रधान मोदींचे पाय धुवून ते पाणी प्राशन करायचे आहे. माझी जर त्यांच्याशी भेट घालून दिली तर मी हे करायला तयार आहे. मी त्यांना व्यक्तीशः ओळखत नाही. मी अजून त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही. जसे आपण देवाला कधी भेटलो नाही, तरीही त्याची पूजा करतो. त्याप्रमाणेच मी पंतप्रधान मोदींचा आदर करतो. यात मला काहीच वाईट नाही”, असे उद्गार सुदेश बेरी यांनी काढले.

सुदेश बेरी पुढे म्हणाले, “लोक म्हणतात की, जो पत्नीचा झाला नाही, तो देशाचा काय होणार. पण मी म्हणतो, जो मर्यादित झाला नाही, तो अमर्यादित होईल. तुम्ही त्या व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही. त्याच्या विचारांची बरोबरी करू शकत नाहीत. जे लोक शिक्षण, उच्चशिक्षण घेऊन सनदी अधिकारी होतात, पण सेवेत रुजू झाल्यानंतर तेच दुसऱ्यांचे रक्त पीत असतील तर अशा शिक्षणाचा काय उपयोग? मला वाटते पंतप्रधान मोदी माणूस नाही तर विष्णूचा अवतार आहेत.”

‘राम राज्य अवतरले आहे’

सुदेश बेरी याच मुलाखतीत पुढे म्हणाले की, देशात राम राज्य अवतरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहेत.

देशात भ्रष्टाचार वाढला आहे, असाही प्रश्न सुदेश बेरी यांना विचारण्यात आला. यावरही त्यांनी सरकारची बाजू घेत म्हटले की, भ्रष्टाचार वाढलेला नाही. गरीब गरीबच राहतोय, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय असे बोलले जाते. पण हे खोटे आहे. इथे प्रत्येकाला संधी मिळते. त्यांनी स्टार्टअप सुरू करावे. त्यांनी जय श्रीरामचा, घर घर मोदी, हर हर मोदी… असा जयघोष करावा, त्यांना कुणीही थांबवू शकत नाही.