छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिलं जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेला रामराम केल्याची चर्चा रंगल होती. नुकतंच हृताने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

हृता दुर्गुळेही काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. यानंतर ती मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नुकतंच हृता दुर्गुळे हिने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. “मी जेव्हापासून या मालिकेत काम करायला सुरुवात केली, त्यानंतर अनेकदा या चर्चा समोर आल्या होत्या. यामागचे कारण मला अद्याप समजलेले नाही. पण असं काहीही नाही.”

“बाबा कायम माझ्यासोबत माझ्याजवळ असावे म्हणून…”, सायली संजीवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मी माझ्या लग्नासाठी अधिकृतरित्या सुट्टी घेतली होती. लग्नाच्या १५ दिवसांच्या सुट्टीनंतर येत्या सोमवारपासून मी पुन्हा शूटींगला सुरुवात करणार आहे, असेही तिने म्हटले.

तसेच मालिकेच्या सेटवरील अस्वच्छतेवरुन तू नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली “निर्मात्यांशी माझे नेहमीच चांगले संबंध होते. आमच्यात कोणताच वाद नव्हता. प्रत्येक शोमध्ये किंवा सेटवर कोणती ना कोणती सामान्य समस्या असतेच, पण आम्ही एकत्र येत त्यावर उपाय शोधून काढतो. त्यामुळे अशी एखादी गंभीर घटना घडलीच नाही. जर तसं काही असतं तर मीच तुमच्यासमोर ते सांगितले असते किंवा सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असती.”

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळेची एक्झिट, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

“माझ्या सहकलाकाराने एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जाहिरातीचं शूटिंग केलं होतं. त्यानंतर ती नवी दिपू असेल का अशीही चर्चा झाली. प्रेक्षक जे वाचतात त्यावर विश्वास ठेवतात. अशा वेळी सर्व कठीण असतं. प्रत्येकजण खरं काय आहे? हेच विचारतो. माझ्या सोशल मीडियावर असंख्य मेसेज आले आहेत. नाटकादरम्यान बॅकस्टेजला भेटणारे लोकही मला याबद्दल विचारतात. पण मला असं वाटतं की माझ्या कामातूनच मी या चर्चांना उत्तर देईन. मी मालिकेत अजूनही काम करतेय. यापेक्षा आणखी वेगळं स्पष्टीकरण काय हवंय, असे तिने म्हटले.