दिवाळी म्हटलं की मिठाई, रोषणाई आणि आतषबाजी ही आली. पण गेल्या कित्येक वर्षापासून वाढणारे प्रदूषण यामुळे बऱ्याच राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली. तर दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून करोना आजारामुळे फटाके किंवा आतषबाजी करण्यावर आणखी निर्बंध आले होते. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीसह अनेक राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. फटाके बंदीच्या या निर्णयाला अनेकजण समर्थन देत आहेत, तर काहींनी मात्र या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. या मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे.

कंगना रणौत ही अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव सदगुरु यांची अनुयायी असल्याचे म्हटले जाते. नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जग्गी वासुदेव सदगुरु यांचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. यात सदगुरु हे त्यांच्या लहानपणी फटाके फोडण्याचे अनेक आठवणी, त्यातील किस्से सांगताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत तिने दिवाळीतील फटाक्यांवरील बंदीचे समर्थन करणाऱ्यांवर टीका केली.

“ज्या लोकांनी फटाके बंदीचे समर्थन केले आहे, त्यांनी फटाक्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ३ दिवस गाडीचा वापर करणे बंद करावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे. “दिवाळीदरम्यान सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी योग्य उत्तर म्हणजे पुढील ३ दिवस तुमची गाडी न वापरता पायी चालत ऑफिसला जा,” असा सल्ला तिने फटाके बंदीबाबत बोलताना दिला आहे. यावेळी ती म्हणाली की, “अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव सदगुरु हे अशी व्यक्ती आहेत, ज्यांनी लाखो झाडे लावत जगात हिरवळ वाढवण्याचा जागतिक विक्रम केला आहे.”

दरम्यान कंगनाच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर हिने फटाके बंदीच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. तसेच “दिवाळीत फटाके फोडू नका,” असे आवाहनही तिने लोकांना केले आहे.

कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. तर कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरूवात केली होती. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर सर्वेश मेवारा यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असणार आहे.