सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार बॉलिवूडची वाट धरताना दिसत आहेत. यामध्येच सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री कृतिका कमराचं नाव चर्चेत आलं आहे. ‘कितनी मोहब्बत है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री कृतिका लवकरच नितीन कक्कड निर्मित ‘मित्रों’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाच्या नावावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘नवभारत टाईम्स’नुसार, मित्रों हा चित्रपट ‘पेल्ली चुपूलू’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असून या चित्रपटाच्या नावावरुन सध्या काही गैरसमज पसरविले जात आहे. मात्र याविषयी कृतिकाने तिचं मौन सोडल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या नावाचा आणि पंतप्रधानांचा काहीएक संबंध नाही, असं कृतिकाने सांगितलं आहे.

‘मित्रों हा चित्रपट मैत्रीवर आधारित असल्यामुळे त्याला साजेसं असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे या शब्दाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नका. या नावाचा आणि पंतप्रधान देत असलेल्या भाषणाचा किंवा त्यांचा कोणताही संबंध नाही. या चित्रपटामध्ये मैत्रीबरोबरच नातेसंबंधांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे’, असं कृतिका म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘हा चित्रपट नक्कीच तुमच्या पसंतीत उतरेल कारण याची कथा कुठेतरी आपल्या साऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असल्यासारखी वाटते’.

दरम्यान, ‘पेल्ली चुपूलू’ या तेलुगू चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा आणि रितू वर्मा हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावला होता. त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक नितीन कक्कर करत असून त्यांच्या या चित्रपटात कृतिका आणि जॅकीशिवाय प्रतिक बब्बर आणि गुजराती अभिनेता प्रतिक गांधी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.