गेल्या काही दिवसांपासून बच्चन परिवाराची सूनबाई अभिनेत्री ऐश्वर्या घरच्यांवर, विशेषत: अभिषेकवर नाराज आहे आणि सध्या माहेरी जाऊन राहिली आहे, अशा चर्चानी जोर धरला होता. आता ऐश्वर्याची नेमकी नाराजी अभिषेकवर नाही तर सासूबाई जया बच्चन यांच्यावर असल्याचे कळते. अभिषेकशी विवाह झाल्यापासून ऐश्वर्या अमिताभ आणि जया यांच्याबरोबर राहते आहे. आता मात्र, जया बच्चन यांच्या ‘सासू’गिरीला कंटाळलेल्या ऐश्वर्याला नव्या घराचे वेध लागले आहेत.
अभिषेक आणि आराध्याला घेऊन लवकरच ऐश्वर्या नव्या घरात रहायला जाणार असल्याची चर्चा आहे.
एरव्ही सासू आणि सून कोणत्याही जाहीर कार्यक्रमात अगदी एकत्र हसून-खेळून वावरत असल्या तरी त्या दोघींमध्ये सध्या विस्तव जात नाही आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या संसारावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या जया बच्चन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर अंकुश ठेवू पाहत असल्याची ऐश्वर्याची तक्रार आहे. ऐश्वर्याने कोणती व्यावसायिक कामे हातात घेतली आहेत, याचे सगळे तपशील आपल्याला माहीत असले पाहिजेत, असा फतवा म्हणे जया बच्चन यांनी काढला आहे. आपल्या संसारात आणि व्यावसायिक कारकिर्दीच्या बाबतीत चाललेली सासूबाईंची ढवळाढवळ सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने ऐश्वर्या वेगळे राहण्याच्या निर्णयाप्रत असल्याचे समजते.
मध्यंतरी एका कार्यक्रमातही ऐश्वर्याचा एकेरी उल्लेख करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना जया बच्चन यांनी झापले होते. जया बच्चन यांच्या सासूगिरीचा हा पहिलाच जाहीर अविष्कार होता. आता मुंबईत परतल्यानंतर ऐश्वर्याच्या घर सोडण्याच्या इच्छेने जोर धरला असून लवकरच ते पापा अमिताभ यांचा बंगला सोडून जाणार असल्याचे कळते.