अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ तर आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांचे हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत होते. अक्षय आणि आमिर यांच्या दोन्ही चित्रपटांची घोषणा झाली. तिथपासूनच या चित्रपटांबाबत विविध चर्चा रंगत होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता अभिनेता अक्षय कुमारने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – यावर्षी चिपळूणमध्ये पूर का आला नाही? अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं कारण

रक्षाबंधन सणाच्या ऐनमोक्यावर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने एनडीटीव्हीशी संवाद साधताना अक्षय अनेक विषयांवर भरभरून बोलला. यावेळी त्याला ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.

अक्षय म्हणाला, “या सगळ्या गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही. आपण आपल्याच अर्थव्यवस्थेचं नुकसान करत आहोत आणि इतरांचं मन दुखावत आहोत. अशाप्रकारे वागणारे काही लोक आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा.” अक्षय सगळ्या प्रकारच्या ट्रोलिंगकडे सकारात्मक पद्धतीने पाहत असल्याचं यामधून दिसून येत आहे.

आणखी वाचा – Takatak 2 Trailer : ‘टकाटक २’चा सर्वात बोल्ड ट्रेलर प्रदर्शित, इंटिमेट सीन अन् संवादांमुळे चित्रपट चर्चेत

“आमिर आणि मी प्रार्थना करत आहोत की आमच्या दोघांच्या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद मिळो.” असंही अक्षयने यावेळी आवर्जून सांगितलं. ‘रक्षाबंधन’ चित्रपट बहिण-भावाच्या नात्यावर आधारित आहे. तर आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे. आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.