‘बालिका वधू’ या मालिकेत ‘आनंदी’ नावाची भूमिका साकारणारी तरूण अभिनेत्री अंबिका गौरने बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉस या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेस का? असे विचारले असता, मिश्किल हास्य करत तिने “मला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला आवडेल” असे म्हटले.
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी माझ्याकडे ऑटोग्राफ मागितला जातो ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब असल्याचेही ती म्हणाली. बालिका वधू मालिकेतून बाहेर आल्याबद्दल तिला विचारले असता, “या मालिकेच्या केवळ ८० भागांसाठीचा करार झाला होता. हा आकडा ५५० पर्यंत जातो यावरून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची आपुलकी लक्षात येते.” असे म्हटले. तसेच जसे एखादी सुंदर मुलगी मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकून सर्वांच्या मनात स्थान मिळवते तसे, आपल्या आयुष्यात एकदा तरी ‘पा’ चित्रपटातल्या अमिताभ बच्चन यांच्यासारखी एखादी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवायचे असल्याचेही तिने स्पष्ट केले.