रेश्मा राईकवार

एखादी गोष्ट आपण गमावली ही भावना खूप त्रासदायी असते, वेदनादायी असते. एखादी गोष्ट मी गमावली आहे म्हणण्यापेक्षा मुळात आपल्याकडे ती गोष्टच नसते, नव्हती, असं मनाला बजावून जगणं शिकायला हवं, असा विचार चित्रपटाची नायिका मांडते. हा विचार सोपा खचितच नाही, कुठल्याही दुर्घटनेनंतर एखाद्याचं जिद्दीने त्यातून पुन्हा उभं राहणं हा प्रेरणादायी संघर्ष असतोच.. पण हे घडत असताना मुळात माणूस म्हणून आपण नेमके कशाने कोसळतो? याचं भान येणं खूप महत्त्वाचं आहे. ती जाणीव प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट करून देतो.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
this reason Vijay Chawan wife vibhavari chawan exit the acting field
…म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘अनन्या’ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आली आहे. एक स्वतंत्र चित्रपट म्हणूनच याकडे पाहायला हवं खरंतर.. पण एकांकिकेपासून चित्रपटापर्यंत आपलं नाव आणि लेखक-दिग्दर्शक कायम राखत आलेली ही कलाकृती तीन वेगळय़ा माध्यमातून एकच गोष्ट वेगवेगळय़ा पध्दतीने मांडत आली आहे. त्यामुळे या चित्रपटाबरोबर नाटक आणि एकांकिकेची चर्चा होणं, ज्यांनी दोन्ही पाहिलं आहे त्यांच्या मनात तुलना होणं हे साहजिकच आहे. पण अनन्या नामक तरुणीच्या जिद्दीची ही कथा रंगवताना चित्रपट या माध्यमाचं भान ठेवत त्याचा वेगळा भावनांक रंगवणं गरजेचं होतं. ज्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखक – दिग्दर्शक प्रताप फड यांनी केला असल्याचं चित्रपट पाहताना जाणवतं. अनन्या ही खूप हुशार तरुणी. दिसायला सुंदर, कुशाग्र बुध्दिमत्ता, साधा-सरळ गोड स्वभाव. अनुरूपतेच्या यादीत जे जे काही घटक आवश्यक या यादीत मोडतात त्यावर टिक करत जावं, अशी ही सर्वगुणसंपन्न मुलगी. तिच्या आयुष्यात घडलेला एक अपघात तिला सर्वगुणसंपन्न ते कोणाच्या तरी गळय़ातील धोंड अशा अवस्थेपर्यंत आणून सोडतो. या सगळय़ातून अनन्या कशा पध्दतीने स्वत:ला बाहेर काढते, हा संघर्ष या कथेत आहे. मात्र पडद्यावर ही संघर्षकथा रंगवताना त्यापलीकडे जाऊन दिग्दर्शक बरंच काही सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करतो.

एखादी दुर्घटना घडल्यानंतर शरीराचा काही एक भाग गमावणं हे दुर्दैव स्वीकारताना त्या माणसाची कसोटी लागते. अशा कठीण प्रसंगात जिवलगांची साथ मिळाली तर हा संघर्ष सुकर होतो, अर्थात हा आदर्शवाद झाला. अनन्याची गोष्ट सांगताना दिग्दर्शक वास्तवात काय घडतं हे ठामपणे सांगतो. इथे अनन्याचं तिच्या वडिलांशी आणि भावाशी असलेल्या नात्यावर दिग्दर्शकाने लक्ष केंद्रित केलं आहे. संकट आल्यानंतर तो माणूस कोसळतोच, मात्र त्याच्याशी जोडली गेलेली माणसं त्याहून वेगाने कोसळतात. अगदी घट्ट, जिव्हाळय़ाच्या वाटणाऱ्या नात्यांची वीण उसवत जाते. इतकी वर्ष जे जपलं ते खरं होतं की आता जे वास्तव आहे ते खरं आहे?  असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती बिघडत जाते. या मानसिक धक्क्यातून सावरणं ही पहिली पायरी असते. मुळात कोणताच माणूस चांगला आणि वाईट या दोनच शब्दांत मांडता येत नाही. भल्याबुऱ्याचं मिश्रण असलेले आपण आणि आपली माणसं हे पुन्हा पहिल्यासारखं जोडलं जाणं अंमळ अवघड असलं तरी अशक्य नसतं. मात्र त्यासाठी मुळात खंबीरपणे उभं राहण्याचा संघर्ष आपला आपल्यालाच करावा लागतो. मन खंबीर असेल आणि पुढे जाण्याची इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही, हे सांगण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न कथामांडणीतून आणि कलाकारांच्या अभिनयातून यशस्वीपणे उतरला आहे.

वर म्हटल्याप्रमाणे अनन्याची गोष्ट हा मुख्य धागा असली तरी तिच्याभोवती असलेल्या व्यक्ती ही गोष्ट घडवतात किंवा बिघडवतात. त्या व्यक्तिरेखांची मांडणी आणि त्यासाठीची कलाकारांची निवड दिग्दर्शकाने अचूक केली आहे. योगेश सोमण, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार या जाणत्या मंडळींबरोबरच सुव्रत जोशी, रुचा आपटे या तरुण कलाकारांनी खूप सहज आणि चांगल्या पध्दतीने आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतला आहे. ऋता  दुर्गुळेचा हा अभिनेत्री म्हणून पहिलाच चित्रपट आहे. या भूमिकेसाठी तिला शारीरिक स्थित्यंतराला सामोरं जावं लागलं आहे. दोन हात नसलेली व्यक्ती कशा पध्दतीने वावरेल, रोजची कामं कशा पध्दतीने करेल, हे समजून घेत तिने अनन्याची भूमिका अत्यंत बारकाव्याने साकारली आहे. अमेय वाघही या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून सामोरा येतो, तो त्याच्या नेहमीच्या सहजतेने या भूमिकेत वावरला आहे. मात्र काही प्रसंगातील त्याचा प्रवेश आणि एकूणच संवादाची पध्दत, देवाणघेवाण यामुळे ‘दुनियादारी’ किंवा ‘भाडिपा’च्या घरात शिरल्यासारखं वाटतं.

चित्रपटाचं संकलन प्रसिध्द दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे, त्यामुळे तोही सफाईदारपणा त्यात जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रताप फड यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी तांत्रिक बाजूत चित्रपट कमी पडत नाही. काही ठिकाणी व्हीएफएक्सची मर्यादा जाणवते. तर काही प्रसंग उगाच ओढल्यासारखे वाटतात. त्यातला अमेयच्या सारख्या सारख्या प्रवेशाचा आणि शेवटाकडचा भाग उगाच ओढला आहे किंवा तो त्याच पध्दतीने करायचा होता तर त्याचा क्रम काही प्रमाणात बदलणं योग्य ठरू शकलं असतं. अनन्याच्या जिद्दीला गोड सुखांताची जोड देण्याची खरंच गरज होती का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. उत्तम निर्मितीमूल्यं, कथा-दिग्दर्शन, उत्तम अभिनय, पार्श्वसंगीत या सगळय़ाच्या जोरावर ‘अनन्या’ प्रभावीपणे एका चिवट जिद्दीची कथा रंगवण्यात यशस्वी ठरला आहे.

अनन्या

दिग्दर्शन – प्रताप फड कलाकार – ऋता  दुर्गुळे, योगेश सोमण, रेणुका दफ्तरदार, सुव्रत जोशी, रुचा आपटे, अमेय वाघ, सुनील अभ्यंकर आणि चेतन चिटणीस.