बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कंगनाने तिच्या उत्तम अभिनय शैलीमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान भक्कम करणाऱ्या कंगनाने तिच्या अभिनयाचं श्रेय बॉलिवूडमधल्या एका खास व्यक्तीला दिलं आहे.

‘नवभारत टाईम्स’नुसार, रोखठोक बोलण्यामुळे आणि उत्तम अभिनयामुळे कंगना कायमच चर्चेत असते. कंगनाने आतापर्यत अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम करुन स्वत:ला सिद्ध केलं आहे. मात्र तिच्या अभियाचा श्रीगणेशा दिग्दर्शक अनुराग बासूमुळे खऱ्या अर्थाने झाला असं मत तिने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे.

‘ज्यावेळी मी पहिल्यांदा कॅमेरासमोर गेले तेव्हा प्रामाणिकपणे अभिनय करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अभिनय करायचा नसतो तर तो जगायचा असतो हे पहिल्यांदा मला अनुरागने सांगितलं. त्यामुळे मला खऱ्या अर्थाने अनुरागनेच अभिनय शिकवला आहे, असं कंगना म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, खरंतर अनुरागमुळे माझ्या करिअरचा आलेख उंचावला. आज मी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र अनुराग यांच्यापुढे मी कायमच एक लहान मुलगी आणि विद्यार्थीनी असेन.

दरम्यान, कंगना ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असून या चित्रपटासाठी ती बरीच मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे.