अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नवीन वाद सुरू झाला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लाखोंच्या संख्येने नकारात्मक कमेंट्स केल्या जात आहेत. सुशांतचे चाहते आणि सलमानचे चाहते यांच्यामध्ये सोशल मीडियावर द्वंंद्व सुरू आहे. अशातच सलमानचा खानचा भाऊ अरबाज खान याने ट्विट करत एकंदर परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर’ असं उत्तर त्याने ट्रोलर्सना दिलंय.

रविवारी केलेल्या या ट्विटमध्ये अरबाजने म्हटलं, ‘रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं अशी म्हण आम्हाला शाळेत शिकवली गेली होती. या म्हणीचा खोल अर्थ जाणून घेण्यासाठी मी तेव्हा खूप लहान होतो. पण आता आजूबाजूला जे काही घडतंय ते पाहून मला याच म्हणीची प्रचिती येतेय.’

आणखी वाचा : सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

सलमानच्या चित्रपटांवर बंदी आणा अशीही मागणी सुशांतचे चाहते सोशल मीडियावर करत आहेत. #BoycottKhans हा हॅशटॅगसुद्धा ट्विटरवर ट्रेण्ड होऊ लागला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानने ट्विट करत चाहत्यांना विनंती केली होती. ‘या कठीण काळात सुशांतच्या कुटुंबीयांच्या व त्याच्या चाहत्यांच्या पाठीशी उभे राहा,’ अशी विनंती सलमानने त्याच्या चाहत्यांना केली होती. शनिवारी रात्री उशिरा त्याने हे ट्विट केलं होतं.