भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील दहशवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत अनेक कार्यक्रम रद्द होत आहेत.

आज शुक्रवारी (९ मे) अबू धाबी येथे होणारा गायक अरिजीत सिंगचा कॉन्सर्टही आता होणार नाही. कॉन्सर्ट रद्द केला जात आहे. प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पैसेही परत केले जातील.

सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

गुरुवारी अरिजीतच्या टीमने त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर कॉन्सर्टशी संबंधित एक अपडेट शेअर केले. त्यात लिहिले आहे, “अलीकडील घटनांमुळे आम्ही अबू धाबीमध्ये अरिजीत सिंगचा लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॉन्सर्ट आज शुक्रवारी (९ मे) ‘एतिहाद एरिना, यास आयलंड’ येथे होणार होता. यावेळी तुमच्या संयमाची आणि पाठिंब्याची आम्ही प्रशंसा करतो. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, “खरेदी केलेली सर्व तिकिटे पुढील तारखेपर्यंत वैध असतील किंवा तुम्हाला १२ मे २०२५ पासून सात दिवसांच्या आत रिफंड मिळू शकतो.”

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे अरिजीतचा हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. ही परिस्थिती काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आहे. अलीकडेच भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

अरिजीतने यापूर्वीही त्याचा कॉन्सर्ट रद्द केला होता.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अरिजीत सिंगने २७ एप्रिल रोजी चेन्नईतील नंदनम येथील वायएमसीए ग्राउंडवर होणारा त्याचा कॉन्सर्टही रद्द केला होता. त्याचप्रमाणे गायिका श्रेया घोषालनेही तिचा कॉन्सर्ट रद्द केला होता.

राजकुमार रावच्या चित्रपटावर झाला परिणाम

गुरुवारी सकाळी राजकुमार राव आणि वामिका गब्बी स्टारर ‘भूल चुक माफ’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनीही सध्याची परिस्थिती लक्षात घेता, त्यांचा चित्रपट थिएटरऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल