हृतिक रोशन आणि सुझॅन खान यांनी वेगळे व्हायचा निर्णय जाहीर केला होता तेव्हापासून अर्जुन रामपालच्या मागेही माध्यमांचा ससेमिरा लागला होता. ह्रतिक आणि सुझॅन कायदेशीर मार्गाने वेगळे झालेही मात्र या सगळ्यासाठी अर्जुन रामपाल कारणीभूत आहे. त्याचे आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया यांचेही संबंध बिघडले आहेत. म्हणूनच अर्जुनने सुझॅनच्या संसारात ढवळाढवळ केली, असे तर्कवितर्क लावले गेले. तेव्हापासून अर्जुन आणि मेहेर यांच्या मागावर असलेल्या माध्यमांची ‘त्या’दिवशी कशी फसगत झाली, याचा किस्सा सांगत अर्जुननेही झाल्याप्रसंगाची खिल्ली उडवली आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्जुन रामपालही मेहेरपासून घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. हे दोघेही वांद्रे कोर्टात उपस्थित होते. त्यामुळे त्यांचे ताणलेले नातेसंबंध अखेर घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आले आहेत, असा तर्क  लावला गेला. दुसऱ्या दिवशी खुद्द अर्जुनने ट्विटरवरून वांद्रे कोर्टात मीच होतो पण, घटस्फोट घेणारा तो मी नव्हेच.. अशा शब्दांत हा सगळा तर्क किती फसवा होता याचा किस्सा सांगितला आहे. अर्जुनचा मॉडेलिंग क्षेत्रातील मित्र मार्क रॉबिन्सन आणि त्याची पत्नी वालूशा डिसूझा हे घटस्फोट घेणार आहेत. या दोघांशीही घनिष्ठ संबंध असल्याने त्यावेळी त्यांच्याबरोबर अर्जुन आणि मेहेर दोघेही वांद्रे कोर्टात उपस्थित झाले होते. मी मार्क साठी तिथे गेलो होतो. आमच्या नात्यात कुठलाच दुरावा आलेला नाही, असे अर्जुनने म्हटले आहे.
मात्र, एवढे बोलून तो थांबला नाही. खरेतर, ह्रतिक आणि सुझॅन प्रकरणात अर्जुनचे नाव गोवण्यात आले तेव्हा तो माध्यमांवर चांगलाच वैतागला होता. आपला आणि सुझॅनचा काहीही संबंध नाही हेही त्याने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते. यावेळी मात्र आपल्यासाठी चांगलेच जाळे विणण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात माध्यमांना मिळालेली माहिती इतकी चुकीची होती की त्यांचीच फसगत झाली, याचा आनंदच अर्जुनने ट्विटरवरून व्यक्त केला आहे.