क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असून मुंबईत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीकडून या धाडी टाकल्या जात असल्याचे समजत आहे. दरम्यान एनसीबीचे एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचले होते. त्यावेळी शाहरुखने एनबीसीच्या कामाची प्रशंसा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाहरुखने एनसीबी अधिकाऱ्यांना, ‘तुम्ही चांगले काम करताय पण माझा मुलगा आर्यन तुरुंगातून लवकर घरी परत यावा अशी इच्छा आहे’ असे म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री अन्यना पांडेच्या घरी एनसीबीने छापा टाकला. त्यानंतर एनसीबी पथक शाहरुख खानच्या घरी पोहोचले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

फोटो : शाहरुख खानचा ‘मन्नत’ आतून कसा दिसतो पाहिलंय का?

अनन्या पांडेच्या घरावरही छापा
एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

आणखी वाचा : ‘चांगले वर्तन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे…’, स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

आर्यन खान गेल्या जवळपास १५ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाहीये. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार असली, तरी इकडे एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.