बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. दरम्यान आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जेलमधील अनेक अधिकारी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहे. तसेच आर्यनला स्पेशल जेलमध्ये ठेवले जाणार असल्याचेही बोललं जात आहे.

शनिवारी २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर कोर्टात सुनावणीदरम्यान त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. यानंतर त्याची रवानगी थेट आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. तर दुसरीकडे अद्याप आर्यनला जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जेल प्रशासनाने आर्यन खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यामुळे आर्यन खानला स्पेशल बरॅकमध्ये हलवण्यात आले आहे. या ठिकाणी त्याच्यावर काही अधिकारी लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे आर्थर रोड जेलमध्ये तो इतर ड्रग्जप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींसोबत बोलत नाही. त्यांना भेटतही नाही. तसेच तुरुंगातील परिस्थिती आणि त्याठिकाणच्या जेवणाबद्दल जुळवून घेण्यास अडचणी येत आहेत. यासह इतर कारणामुळे जेलमधील अधिकारी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहे.

महिन्यातून एकदा पाठवता येते मनीऑर्डर

आर्यन खानला जेलमध्ये ११ ऑक्टोबरला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर आलं आहे. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे कोणत्याही कैदीचे घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकत नाही. 

२० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम

दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने १४ ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान आदेश राखून ठेवला आहे. येत्या २० ऑक्टोबरला याप्रकरणी पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाची १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान सुट्टी असेल. विजयादशमीच्या निमित्ताने उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालय सलग ५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आर्यन खानला जामिनासाठी २० ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.