टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपटातील अॅक्शन सीन्सची तोंड भरुन स्तुती केली. तर काही जणांनी चित्रपटाची खिल्ली देखील उडवली. चित्रपटावर जाहीररीत्या टीका करणाऱ्यांमध्ये अभिनेता कमाल खान आघाडिवर आहे. “बागी ३ चित्रपटाची पटकथा दर्जाहीन आहे. या कथेची निर्मिती करणाऱ्याचे हात कापायला हवेत” असे वादग्रस्त वक्तव्य करुन त्याने ‘बागी ३’ न पाहाण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे.

काय म्हणाला कमाल खान?

बिग बॉसच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला कमाल खान उर्फ केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. यावेळी त्याने आपला निशाणा टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ वर साधला आहे. त्याने यूट्यूबवर या चित्रपटाचे समिक्षण केले आहे. यात तो म्हणतो, “हा चित्रपट दर्जाहिन चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा फरहाद सामजी याने लिहिली आहे. या कथानकाची मांडणी त्याने इतक्या खराब पद्धतीने केली आहे, की त्यासाठी शिक्षा म्हणून त्याचे हात कापायला हवेत. जेणेकरुन पुन्हा कधी अशा कथानकाची निर्मिती त्याला करता येणार नाही.” अशा शब्दात केआरकेने त्याच्यावर टीका केली आहे.

‘बागी ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात टायगर श्रॉफ बरोबरच अभिनेता रितेश देशमूख आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट बागी सीरिजमधील तीसरा चित्रपट आहे. हा चित्रपट त्यातील अॅक्शन सीन्समुळे विशेष चर्चेत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीन खरे वाटावे यासाठी तब्बल ४०० स्फोटकांचा वापर करण्यात आला. तसेच चित्रपटातील बहुतांश स्टंट टायगरने स्वत: केले आहेत.