बाहुबली सिनेमाने तोडला नाही असा एकही रेकॉर्ड शिल्लक राहिला नसेल. एसएस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' सिनेमाने १० दिवसांतच १००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची बॉक्स ऑफिस कमाई केली. आतापर्यंत कोणत्याही भारतीय सिनेमाला एवढी कमाई करणं शक्य झालेलं नाही. दोन भागात बनलेल्या बाहुबली सिनेमाचा पहिला भाग 'बाहुलबीः द बिगिनिंग' १८० कोटींमध्ये बनला होता. तर 'बाहुबली २' या सिनेमात तब्बल २५० कोटींची गुंतवणूक केली होती. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही प्रभास, राणा डग्गुबती, रम्या कृष्णन, सत्यराज, अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. बॉलिवूडमध्ये सुपरस्टार फक्त सिनेमात काम करण्याचे मानधनच घेतात असे नाही तर सिनेमा हिट झाला तर नफ्यातले काही शेअर्सही घेतात. बाहुबलीच्या बाबतीतही सध्या असेच काहीसे होत आहे. बाहुबली सिनेमा सर्व बाजूंनी पैसा कमवत आहे. बाहुबलीच्या नफ्यामधले काही शेअर्स आता वाटून घेतले जात आहेत. प्रभास (बाहुबली)- या माणसाने बाहुबली सिनेमासाठी आपल्या आयुष्यातली पाच वर्षे दिली. करिअरमध्ये यशाची उंची गाठलेली असताना पाच वर्षे फक्त एकाच सिनेमासाठी देण्याचा निर्णय घेणे हीच फार मोठी गोष्ट आहे. या पाच वर्षांमध्ये एक वेळ अशीही आली होती की प्रभासकडे पैसे नव्हते. पण तरीही त्याने दुसरा कोणताही सिनेमा किंवा जाहिरातीसाठी करार केला नाही. प्रभासचं या सिनेमासाठीचं समर्पणच खूप काही सांगून गेलंय. या सिनेमासाठी प्रभासने २५ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. कलाकारांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये प्रभासचं नाव अग्रगणी येतं. राणा डग्गुबती (भल्लालदेव)- प्रभासच्या भूमिकेला तोडीसतोड कोणाची भूमिका असेल तर ती म्हणजे भल्लालदेवची म्हणजेच राणा डग्गुबतीची. ज्या पद्धतीने राणाने भल्लालदेव साकारला इतर कोणत्याही अभिनेत्याने तसा तो साकारला असता यावर प्रेक्षकांचा विश्वास बसणार नाही. पण प्रभासपेक्षा त्याचे मानधन खूप कमी होते. राणाने सुमारे १५ कोटी रुपयांचे मानधन या सिनेमासाठी घेतले. अनुष्का शेट्टी (देवसेना)- अनुष्काला पहिल्या भागात एवढ्या वेगळ्या रुपात पाहणं सर्वांनाच धक्का देणारं होतं. पण त्याहून मोठा धक्का तिला बाहुबलीच्या दुसऱ्या भागात बसून मिळाला. बाहुबली २ मध्ये अनुष्काने ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे ती वाखाण्याजोगीच आहे. अनुष्काने या सिनेमासाठी ५ कोटी रुपयांचे मानधन आकारले होते. तमन्ना भाटिया (अवंतिका)- अनुष्काप्रमाणे तमन्नानेही या सिनेमासाठी ५ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं. 'बाहुबली २' मध्ये जरी तमन्ना फार दिसली नसली तरी बाहुबलीच्या पहिल्या भागात तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. रम्या कृष्णन (शिवगामी)- बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांत सर्वात जबरदस्त भूमिका कोणाची असेल तर ती म्हणजे रम्या कृष्णनने साकारलेली शिवगामी देवी. एखाद्या राज्याची राजमाता कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शिवगामी देवी. पण रम्याला या सिनेमासाठी फार कमी मानधन मिळाले होते. रम्याने फक्त २.५ कोटी रुपयेच आकारले होते. सत्यराज (कटप्पा)- बाहुबली ही व्यक्तिरेखा जेवढी प्रसिद्ध झाली तेवढीच प्रसिद्ध कटप्पा ही व्यक्तिरेखा झालेली. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हा तर राष्ट्रीय प्रश्नच बनला होता. या सिनेमासाठी सत्यराजला २ कोटी रुपये देण्यात आले होते. एसएस राजामौली- राजामौली यांच्याच डोक्यातून आलेली ही संकल्पना. राजामौलींच्या पाच वर्षांच्या या अथक मेहनतीसाठी त्यांना २८ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे. पण या मानधनाशिवाय बाहुबली सिनेमाच्या नफ्यातला एक तृतियांश वाटाही त्यांना मिळणार आहे.