अभिनेत्री आलिया भट्टच्या वैयक्तिक आयुष्यात ‘डिअर जिंदगी’तील कायराची झलक वेळोवेळी पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जोक्स, मते आणि आयुष्यातील अनेक गोष्टी बिनधास्तपणे शेअर करत असते. मग, रिलेशनशिपबद्दल मत असो, मैत्रीच्या नात्यातील गोडवा असो किंवा आयुष्यात येणाऱ्या समस्या ती अगदी मनमोकळेपणाने मांडताना दिसते. तिच्या या स्वभावामुळे अनेकदा तिच्यावर टीका देखील झाली. मात्र, तिने व्यक्त होण्याचे कधीच थांबली नाही. नुकतेच आलिया कॉरनेटो आइस्क्रिमची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनली. यापार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये तिने मैत्रीच्या नात्यावर बोलताना मित्र आणि जीवलग मित्र यातील फरक सांगितला.

आलिया म्हणाली की, “मित्राच्या यादीतील अनेक चेहऱ्यांमध्ये जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतारामध्ये तुमच्यासोबत असते, ती तुमची खास मैत्री.” यावेळी आलिया सोशल मीडियावरील तिच्या मतांवरुन निर्माण होणाऱ्या विनोदावरही बोलली, आलिया म्हणाली की, मी विनोदी किस्से, मत माझ्या खास मित्रांसोबतच शेअर करत असते. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते पण, ही मंडळी माझ्या विनोदावरुन कोणतीही मतं बनवत नाहीत. कारण ते तुम्हाला चांगले ओळखत असतात. आलिया भट्ट चांगली खवय्यादेखील आहे. खवय्येगिरी विषयी आलिया म्हणाली की, “तुम्ही खाण्यावर किती प्रेम करता हे फक्त तुमच्या खास मित्रांना ठाऊक असते. जगातील इतर व्यक्ती तुमच्या पोटाचा अंदाज लावू शकत नाहीत. मात्र, तुमचा खास मित्र तुमची ही आवड चांगलीच जाणतो.”

आलिया भट्ट सोशल मीडियावरील ट्विट आणि पोस्टमुळे अनेकदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले आहे. तिच्या जोक्स आणि बालीशपणाची टीकादेखील नेटिझन्स करतात. मात्र, आलिया हा सर्व प्रकार हसण्यावारी घेताना दिसते. आलियाने नेटिझन्सना प्रत्युत्तर देण्यापेक्षा कामातून स्वत:ला सिद्ध केले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटातील अभिनयाने तिच्यावर कौतुकाच वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.