''दोन वर्षांआधी सुरू झालेल्या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजत आहे. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभर प्रेम दिले.बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. यानंतर या मालिकेत आता नवा अध्याय घडणार आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या दैवी सामर्थ्याचा नवा अध्याय सुरु होणार आहे. बाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं तसंच त्यांचं उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं. या उत्तरार्धामध्ये एक महत्वाचा बदल झाला होता.तो म्हणजे बाळूमामा लोकांना ठाऊक झाले होते. असंख्य माणसं त्यांच्याशी प्रेमाच्या नात्यानं जोडलेली होती. बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झाले असले तरी त्यांच्यासाठी संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात,अंधश्रद्धा,भेदाभेद ह्या गोष्टी काही संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. लोकांना तेंव्हा एका मोठ्या आधाराची गरज होती, त्यावेळी मामा एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे सावली देणारे ठरले. समाज जरी एका मोठ्या बदलातून जात असला तरी त्यांनी त्यांचे ठरवलेले कार्ये अहोरात्र चालू ठेवले. त्यांच्यासमोर येणाऱ्या माणसांचे त्यांनी पहिले जगण्याचे प्रश्न सोडवले आणि मग त्याला अध्यात्माची गोडी लावली. बाळूमामांचे निसर्गाशी जवळचं नातं होतं. भक्तांसाठी कार्य करत असताना निसर्गात असलेले सगळे जीव किती महत्वाचे आहेत हे त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगातून पटवून दिले. मुक्या जीवांचे प्रेमाने संगोपन ते स्वतः करत होते आणि त्याचबरोबर सर्व जीवांच्या ठाई एकच आत्मा आहे हे आचरणातून सिद्ध करत होते. मामांनी पाच राज्यांमध्ये भ्रमण करत असंख्य कुटुंबांना भक्तीच्या एका सूत्रात बांधलं आणि अनेक पिढ्यांचा उद्धार केला. बाळू मामांच्या या नव्या अध्यायाचा काळ आता मालिकेत पाहायला मिळणार आहे.