मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरगाबादच्या खंडपीठाने ‘जॉलीएलएलबी २’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी पाहण्यासाठी दोन अमायकस क्युरीची (न्याय मित्र) नियुक्ती केली आहे. या सिनेमात वकिलांची किंवा न्यायाधीशांची बदनामी करण्यात आली आहे की नाही हे पाहण्यासाठी अमायकस क्युरीची नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायालयाने सांगितले की, वकील आरएन ढोर्डे आणि व्हीजे दीक्षित हे दोघंही बुधवारी ‘जॉली एलएलबी २’ हा सिनेमा पाहतील. त्यानंतर हे दोघंही त्यांचे अहवाल उच्च न्यायालयाकडे सुपूर्द करतील. त्यानंतर यावर योग्य ती कारवाई केली जाईल. न्यायालयाने सिनेमाच्या निर्मात्यांना या दोन वकिलांना सिनेमा दाखवण्याची तरतूद करण्यास सांगितले आहे.

अजय कुमार वाघमारे नावाच्या एका वकिलाने उच्च न्यायालयात या सिनेमा विरोधात याचिका दाखल करत म्हटले होते की, या सिनेमाच्या नावातून एलएलबी हा शब्द वगळण्यात यावा तसेच न्यायालयात वकील पत्ते खेळताना दाखवण्यात आले असल्याचे दृश्यही वगळण्यात यावे अशी मागणी त्याने यावेळी केली. याचिकेत हेही सांगण्यात आले आहे की कायद्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही प्रतिबंधनही आहेत. याचिकेनुसार या सिनेमात न्यायालयाशी निगडीत लोकांचे विनोदी चित्रण करण्यात आले आहे.

दरम्यान, बॉलीवूडचा हा आघाडीचा अभिनेता लवकरच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लवकरच झळकणार आहे. ‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित सिनेमाच्या त्याच नावाने येणाऱ्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या सिनेमात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. या सिनेमाची चर्चा मराठीमध्ये होणे ही हिंदीवाल्यांसाठी आवश्यक बाब ठरू लागली असल्याने आपल्या सिनेमासाठी अक्षय कुमार पुन्हा मराठीकडे वळला आहे. मात्र यावेळी त्याने ‘चला हवा येऊ द्या’ ऐवजी सध्या नंबर वन असलेल्या ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेची निवड केली आहे. आता लखनौमधला जगदीश्वर मिश्रा आणि कोल्हापूरचा राणा यांची भेट होणार कशी? हा या कथेचा गमतीचा भाग ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो. ‘आय विल सी यु इन कोर्ट..’ ही ओळ या ट्रेलमध्ये अनेकांचेच लक्ष वेधत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेते अन्नू कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रभावी अभिनयाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे एका वकिलाच्या मार्गात कोणताही खटला लढवताना अगदी वाईट परिस्थितीही उद्भवू शकते याचा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यावर येत आहे.