ऑलंपिक पदक क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो. अगदी त्याच प्रमाणे ‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मानबिंदू मानला जातो. भारताला हा सन्मान सर्वात आधी मिळवून दिला होता तो भानु अथैया यांनी. भारतासाठी पहिला ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानु अथैया यांचं निधन झालं आहे. मृत्यूपुर्वी त्यांनी आपली ऑस्कर ट्रॉफी स्वत: जवळ न ठेवता अ‍ॅकॅडमी संस्थेला परत दिली होती.

‘अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ या संस्थेतर्फे ऑस्कर पुरस्कारांचं वितरण केलं जातं. सोनं आणि जस्त या दोन धातूंपासून तयार होणारी ऑस्करची ट्रॉफी अत्यंत महागडी असते. त्यामुळे काही कलाकार आर्थिक टंचाईत असताना ही ट्रॉफी विकून टाकतात. शिवाय ही ट्रॉफी चोरीला गेल्याच्या घटनाही आजवर घडल्या आहेत. त्यामुळे भानू अथ्थैया यांना मात्र आपल्या ट्रॉफीची खूप काळजी वाटतं होती. ती ट्रॉफी चोरीला जाईल किंवा त्यांच्या मृत्यूनंतर तिची योग्य काळजी घेतली जाणार नाही ही चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे २०१२ साली त्यांनी अॅकॅडमी संस्थेला ती ट्रॉफी परत केली. संस्थेने देखील हे सन्मानचिन्ह त्यांच्या संग्रहालयात ठेवलं आहे.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच यात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफ़री यांसारख्या अनेक भारतीय कलाकारांनी देखील काही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु हा चित्रपट विशेष गाजला तो बेन किंग्सले यांचा जबरदस्त अभिनय आणि भानु अथैया यांची वेशभूषा यामुळे.

या चित्रपटातील सर्व कलाकारांच्या कपड्यांचे डिझाईन्स भानू अथैया यांनी तयार केल्या होत्या. अगदी गांधींनी नेसलेल्या सुती धोतरापासून कस्तुरबा गांधी यांच्या साडीपर्यंत सर्व काही वेशभूषाकार भानू अथैया यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार करण्यात आले होते. या कामगिरीसाठी त्यांना १९८३ साली ऑस्कर पुरस्काराने सन्मानीत केले गेले. त्यानंतर २००१ साली आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र थोडक्यात त्यांचा हा पुरस्कार हुकला. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केले आहे. यासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.