‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या शोचे नवे पर्व १० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कपिल शर्माच्या या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. खास नव्या पर्वासाठी कपिलने वजन कमी केले आहे. त्याचा नवा लूक देखील समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच नव्या पर्वाचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. शोमधील काही जुन्या कलाकारांच्या जागी नवे चेहरे आल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते.

काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक याने द कपिल शर्मा शो सोडल्याची घोषणा केली होती. कार्यक्रमाच्या निर्मात्यांशी झालेल्या करारातील चुकांमुळे हा कार्यक्रम करत नसल्याचे कारण त्याने दिले होते. पण कृष्णा अभिषेकने मानधनाच्या मुद्दावरुन कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. गणेशोत्सवादरम्यान एका ठिकाणी त्याने मी ‘कधीही शोमध्ये परत येऊ शकतो..’ असे सांगितले. ”हा आमचाही शो आहे !” अशा शब्दात कृष्णाने शो कायमचा सोडणार असल्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. कृष्णाव्यतिरिक्त अभिनेत्री भारती सिंहने हा कार्यक्रम सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
आणखी वाचा- “हे साफ खोटं आहे की…” विवेक अग्निहोत्रींनी समोर आणलं बॉलिवूडकरांचं सत्य

भारती सिंह द कपिल शर्मा शोचा अविभाज्य भाग आहे. बिझी शेड्युल असूनही ती कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होती. पण काही कारणांमुळे भारतीने हा शो सोडायचा निर्णय घेतला आहे. भारती सिंह सध्याची सर्वात लोकप्रिय सूत्रसंचालिका आहे. ती आणि तिचा पती हर्ष एका कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाचे काम करत आहेत. तसेच तिने आधीच ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’च्या नव्या पर्वामध्ये सूत्रसंचालन करायचे कबूल केले होते. तिला एकाच वेळी खूप काम एकत्र करावे लागत आहे. त्यामुळे द कपिल शर्मा शोसाठी वेळ नसल्यामुळे भारतीने हा कार्यक्रम सोडायचे ठरवले आहे.

भारतीने काही महिन्यापूर्वी तिच्या बाळाला जन्म दिला. जास्तीच्या कामामुळे मुलाकडे दुर्लक्ष होऊ शकते असेही तिला वाटत आहे. हे टाळण्यासाठी तिने कामाचा व्याप कमी करायचे निश्चित केले आहे.