मागच्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या दोघांमध्ये वाद आणि भांडण चालू असलं तरीही त्यांच्यातील क्यूट केमिस्ट्री कोणापासून लपून राहिलेली नाही. अलिकडेच झालेल्या ‘विकेंड का वार’ एपिसोडमध्ये करणनं तेजस्वीकडे आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. एवढंच नाही तर तिनेही त्याचं प्रपोजल मान्य केल होतं. यानंतर राखी सावंतनं करणला तेजस्वीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. पण त्यावर करणनं दिलेल्या उत्तरानं सर्वच हैराण झाले आहेत.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये करण आणि राखी गार्डनमध्ये बसले होते त्यावेळी राखी तेजस्वीचं नाव घेत करणला म्हणाली, ‘मी काय म्हणते, मुलगी चांगली आहे. सर्वकाही चांगलं आहे. मार्चमध्ये तसंही तुला लग्न करायचं आहे. तर मग हिच्याशीच लग्न कर.’ त्यावर करण राखीला म्हणतो, ‘मला सांग तू स्वतः एवढ्या वर्षांनंतर लग्न केलं आहेस. काही तरी विचार करूनच केलं असशील ना सर्व.’ करणचं बोलणं ऐकून राखी थोडी दुःखी होते आणि सांगते की तिनं हे लग्न काहीच विचार न करता केलं होतं. ती म्हणाली, ‘मी तर असंच लग्न केलं. पण तुला तर एक चांगली मुलगी मिळत आहे. मग काय विचार करायचा. यापेक्षा जास्त काय विचार करणार करण.’

राखीचं बोलणं ऐकून करण सुरुवातीला हसतो आणि म्हणतो, ‘माहीत नाही, मला माहीत नव्हतं की मी इथे येऊन प्रेमात पडेन. मी काल तेजूला हेच सांगत होतो. पहिल्यांदा घरात येण्याआधी मला भीती वाटत होती पण आता भीती वाटतेय की बाहेर गेल्यावर काय होईल.’

दरम्यान तेजस्वी आणि करण यांचे कुटुंबीय त्यांच्या नात्याबाबत खुश आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांना या नात्याबाबत कोणतीही समस्या नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्व काही ठीक आहे तर बिग बॉसच्या घरातील बाहेर पडल्यानंतर हे दोघंही लग्न करण्याची शक्यता आहे. या दोघांच्याही चाहत्यांना या दोघांच्या लग्नाबाबत बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.