बॉलिवूडचे तीन खान हे या चित्रपट व्यवसायात सर्वाधिक गल्ला जमवणारे हुकूमी शिलेदार आहेत. गेल्या काही वर्षांत शंभर कोटी, दोनशे कोटी असा रेकॉर्डब्रेक गल्ला जमवण्यात सलमान खानने आघाडी घेतली होती. त्यामुळे सलमानबरोबर चित्रपट करण्यास इंडस्ट्रीत जो तो उत्सुक  असतो. तरीही गेल्या काही महिन्यांपासून ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या निकालाबद्दल चिंतेत असलेल्या सलमानने नविन चित्रपट घेणे बंद केले होते. तरीही आज सलमानवर बॉलिवूडचे कमीतकमी २०० कोटी रुपये अडकले आहेत. त्याला झालेल्या शिक्षेचा सर्वात मोठा फटका ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या दोन चित्रपटांना बसणार आहे. सध्या सलमान खान दोन चित्रपटांचे चित्रिकरण करत होता. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानचा यावर्षीचा महत्त्वाचा चित्रपट आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे चित्रिकरण शेवटच्या टप्प्यात आले आहे. किंबहूना, याच चित्रपटासाठी काश्मीरमध्ये असलेला सलमान खटल्याच्या सुनावणीसाठी म्हणून मुंबईत दाखल झाला होता. कबीर खान आणि सलमान खान या जोडीच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसच्या यशाची सारी समीकरणेच बदलून टाकली होती. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२.९२ कोटी रुपयांची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ते दोनशे कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट असे विक्रम या जोडीच्या नावावर आहेत. ‘बजरंगी भाईजान’ हा या जोडीचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचे नव्वद टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सलमानला झालेल्या शिक्षेनंतर उर्वरित चित्रपटाचे भवितव्य अंधारात आहे.

* सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘प्रेम रतन धन पायो’ याही चित्रपटाचे चित्रिकरण सलमानने जवळपास पूर्ण करत आणले होते. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनंतर सलमान बडजात्यांबरोबर त्यांचा ‘प्रेम’ म्हणून पडद्यावर परतणार आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
* या चित्रपटाचे ऐंशी टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित चित्रिकरण सलमान कसे पूर्ण करणार? याची चिंता निर्माता-दिग्दर्शकांनाही सतावते आहे. यावर्षीच्या या दोन चित्रपटांमुळे नवीन चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी सलमानने २०१६ च्याच तारखा दिल्या होत्या.
* सलमानबरोबर काम करण्याची अनेक वर्षांची इच्छा करण जोहर ‘शुद्धी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण करणार होता. या चित्रपटाची घोषणाही करणने केली होती. पण, आता हा चित्रपट सुरूच होऊ शकणार नाही आहे.
* यशराजनेही सलमानबरोबर पुन्हा काम करण्याच्या इच्छेने ‘सुलतान’ या चित्रपटाचा घाट घातला होता. सलमानमुळेच हिट झालेल्या ‘नो एंट्री’ या चित्रपटाच्या सिक्वलचीही तयारी सुरू झाली होती. पण, आता त्यांच्यावर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून
* चित्रपटनिर्मात्यांप्रमाणेच जाहिरातदारांचेही सलमानवर पैसे अडकले असल्याचे बोलले जाते.