दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचारावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली असून हिंसा हा कोणत्याही समस्येवरील उपाय नसल्याचं म्हटलं आहे. जेएनयूमध्ये झालेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांकडून येणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर अद्यापही कॅम्पसच्या आतमध्ये काय झालं याबाबत आपल्याला स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. योग्य माहिती नसेल तर आपण आगीत तेल ओतण्याचं काम करु शकत नाही असं मत अजयने व्यक्त केलं आहे.

“मी सकाळपासून बातम्या पाहत आहे. पण हे खूपच गुंतागुंतीचं आहे. अद्यापही कोणी काय केलं आहे याची योग्य माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं ठरेल. जे काही सुरु आहे तू खूप दुर्दैवी आहे,” असं मत अजय देवगणने व्यक्त केलं आहे.

“जे कोणी हे करत आहे ते अत्यंत चुकीचं आहे. हिंसा हा कोणत्याही मुद्द्यावरील उपाय नाही. यामुळे फक्त आपल्या देशाचं नुकसान होत आहे. यामागे नेमका काय अजेंडा आहे हे जर तुम्हाला कळलं असेल तर मलाही सांगा, कारण बातम्या पाहून मला त्याबाबत स्पष्ट असं काही कळलेलं नाही,” असं अजयने म्हटलं आहे. रविवारी काही अज्ञात हल्लेखांनी चेहरा रुमालाने झाकून जेएनयूमध्ये घुसखोरी करत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली. या हल्ल्यात जवळपास ३५ जण जखमी झाले. जखमींमध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषचाही समावेश होता.

आणखी वाचा – #JNUViolence : ‘तू लाठी आण… आम्ही हिंमत आणू’; ‘धुरळा’च्या दिग्दर्शकाचं ट्विट

या मुद्द्यावर आतापर्यंत मौन बाळगल्याबद्दल विचारलं असता अजयने सांगितलं की, “एक सेलिब्रेटी म्हणून आपल्यावर एक जबाबदारी असते. त्यात काही वक्तव्य करुन अजून गोंधळ निर्माण करण्याची आपली इच्छा नाही. सेलिब्रेटींनी काही बोलण्याआधी माहिती मिळवणं गरजेचं असतं”.

“जेव्हा आम्ही काही बोलतो तेव्हा ते गांभीर्याने घेतलं जातं. मग ते योग्य पद्धतीने असो किंवा चुकीच्या पद्धतीने असो. पण जोपर्यंत तुमच्याकडे योग्य माहिती उपलब्ध नाही तुम्हाला बोलण्याचा काही हक्क नाही. आपण गोंधळात भर टाकू शकत नाही. आपण प्रथम योग्य माहिती मिळवणं गरजेचं आहे,” अशी भावना अजयने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – #JNUViolence: “जे काही सुरु आहे ते संतापजनक,” दीपिकाची पहिली प्रतिक्रिया

“हे का होत आहे किंवा कोण करत आहे ? यामागचा अजेंडा काय आहे ? जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तुम्ही शांत राहिलं पाहिजे. जर लोकांना हे गुंतागुंतीचं वाटत असेल तर हा मूर्खपणा आहे. आपण आगीत तेल ओतण्याचं काम करु शकत नाही,” असं स्पष्ट मत अजयने व्यक्त केलं आहे. अजय देवगण सध्या त्याचा चित्रपट ‘तान्हाजी’चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. हा चित्रपट १० जानेवीराला रिलीज होत आहे. अजयसोबत चित्रपटात सैफ अली खान, काजोलही मुख्य भूमिकेत आहेत.