रणबीर आणि कतरिना येत्या काळात ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोन्ही कलाकारांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर आणि कॅट आता मात्र या नात्यातून वेगळे झाले असून फक्त आणि फक्त एकमेकांचे सहकलाकार म्हणून वावरताना दिसतात. त्यांच्या ब्रेकअप विषयीसुद्धा या दोघांनीही बोलणं टाळलं. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि कतरिनाने हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात ब्रेकअपमुळे त्यांच्यात कमालीचा दुरावा पाहायला मिळाला. पण, आता मात्र ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने दोघंही एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत.

अशाच एका मुलाखतीदरम्यान रणबीरने त्याच्या आयुष्यातील कतरिनाचं नेमकं स्थान आहे तरी काय, यावरुन पडदा उचलला. त्यांच्या नात्याची वेगळीच बाजू रणबीरच्या वक्तव्यातून पहायला मिळाली. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटानंतर कतरिनासोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. चित्रपट हे एक महागडं माध्यम आहे. इथे अनेकांचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो. त्यातही बरेच लोक तुमच्यावर अवलंबून असतात. माझ्या आणि कतरिनाच्या नात्याविषयी आजवर माध्यमांमध्ये जे काही सांगण्यात आलं, जे काही अंदाज बांधण्यात आले ते नेहमीच सकारात्मक होते. माझ्या आयुष्यात तिचं स्थान महत्त्वाचं आहे. ती मला माझ्या आयुष्यात हवीये, मला तिची आजही गरज आहे. कारण, आजवरच्या प्रवासात तिच्यासोबत असण्याचा बराच प्रभाव माझ्यावर पाहायला मिळाला आहे आणि हे असंच सुरू राहिल’, असं रणबीरने स्पष्ट केलं.

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती

यावेळी त्याने चित्रपटातील भूमिकेविषयीसुद्धा बरीच माहिती दिली. ‘या चित्रपटासाठी तिनेही बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे माझ्या इतकीच तिची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची आहे. तिच्यासोबतचं माझं नातं, आमची पार्टनरशिप या साऱ्याबद्दल मी तिचे आभार मानतो’, असं रणबीर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. दरम्यान, ‘सावरिया’ रणबीर सध्या दिल्लीस्थित एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटसृष्टीशी तिचा काहीच संबंध नसून आता हे नातं कधी सर्वांसमोर येतंय याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…