बरीच दशकं हिंदी चित्रपटसृष्टीतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. चित्रपटांपासून विविध वादांमुळेही चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्याला भाईजान, दबंग खान वगैरे विशेषणांनी संबोधलं जातं. त्यातीलच त्याची आणखी एक ओळख म्हणजे यारों का यार. अनेक नव्या चेहऱ्यांना या कलाविश्वात नवी ओळख मिळवून देण्यासाठी सलमानने मदत केली. त्यामुळेच की काय त्याच्या मित्रमंडळींची संख्या वाढतच गेली. त्याशिवाय सलमानच्या शत्रूंच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत गेली. अशाच काही सेलिब्रिटींपैकी एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर.

नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सलमानने आपले कोणीही शत्रू नसल्याचं सांगितलं. पण, असं सांगतेवेळी त्याने आपण काही व्यक्तींचा तिरस्कार करतो. ज्यामुळे आपल्याला कोणताच फरक पडत नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. जर कोणी आपल्या कुटुंबाचा, कुटुंबियांचा आदर करत नसेल तर त्या व्यक्तींचा मीसुद्धा आदर करत नाही, असं त्याने स्पष्ट केलं. त्याशिवाय या कलाविश्वात एक- दोन कुटुंब अशीही आहेत ज्यांनी कधीच आपल्या कुटुंबाला नीट वागणूक दिली नसल्याचंही सलमानने सांगितलं. त्याच्या मते काही व्यक्तींचा आपल्या घरात कधीच प्रवेश होणार नाही. सलमानचं हे वक्तव्य अभिनेते ऋषी कपूर यांना अनुसरून असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

salman khan, rishi kapoor- काय होता वाद?

अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये ऋषी कपूर यांनी सोहेल खानच्या पत्नीशी गैरवर्तन केल्यामुळे सलमान आणि ऋषी कपूर यांच्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. किंबहुना त्यावेळी सलमान ऋषी कपूर यांची भेट घेण्यासाठी गेलाही होता पण, तेव्हापर्यंत ते सोनमच्या रिसेप्शन पार्टीतून निघून गेले होते. तेव्हा आता दबंग खानचं हे वक्तव्य ऐकून ऋषी कपूर त्यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.