सोशल मीडियावर सध्या सतत बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड होताना दिसत आहे. लोकं सातत्याने बॉलिवूडचे येणारे चित्रपट हाणून पाडत आहे. नुकत्याच आलेल्या ‘लाइगर’ हा चित्रपटही फ्लॉप ठरला आहे. रणबीर कपूरपासून आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट सपशेल आपटले आहेत. प्रेक्षक एकप्रकारे बॉलिवूडबद्दल असलेला त्यांचा राग व्यक्त करत आहेत. याविषयी कित्येक बॉलिवूड कलाकार, निर्माते दिग्दर्शक यांनी वक्तव्य केलं आहे. काहींनी बॉलिवूडची बाजू घेतली आहे तर काहींनी खडेबोल सुनावले आहेत. यामध्येच आता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यानेदेखील मौन सोडलं आहे.

एकंदरच या बॉयकॉट ट्रेंडवर सुनील शेट्टीला विचारलं असता त्याने एका एजन्सीजवळ याबाबतीतलं त्याचं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणतो, “आम्ही याआधी बरेच चांगले चित्रपटही केले आहेत. परंतु सध्या ज्या प्रकारचं कथानक चित्रपटात बघायला मिळत आहे ते प्रेक्षकांना रुचणारं नसल्याने आमच्यावर ही परिस्थिति ओढवली आहे.” असं म्हणत बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी याने चित्रपटाच्या कथेत आणि मांडणीत चुका होत असल्याचं कबूल केलं आहे.

पुढे सुनील शेट्टी म्हणतो की, “एकेकाळी बॉलिवूडचा एखादा चित्रपट न चालणं ही वेगळी गोष्ट होती. पण आता ती अगदी सर्रास व्हायला लागली आहे. प्रेक्षक एका पाठोपाठ एक चित्रपट नाकारत आहेत आणि ही अत्यंत गंभीर समस्या आहे. लोकं चित्रपटगृहाकडे येत नाहीयेत आणि यासाठी त्यांना दोष देणं योग्य नाही.”

आणखी वाचा : “बॉलिवूड हे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेलं नाही”; सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य

याआधीसुद्धा नेपोटीजमच्या वादावरुन सुनील शेट्टीने असंच एक वक्तव्य दिलं होतं ज्यामुळे तो चर्चेत आला होता. शिवाय जेव्हा बॉलिवूडवर अमली पदार्थांचे सेवन करण्याचे आरोप लागले होते तेव्हादेखील सुनील शेट्टीने याबाबतीत वक्तव्य देऊन बॉलिवूडची बाजू घेतली होती. सुनील शेट्टी येणाऱ्या काही दिवसात ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात दिसणार आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.