मुंबई: गेल्या महिन्याभरापासून हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या विवाहाची चर्चा रंगत होती. अखेर गुरुवारी सायंकाळी ते दोघे विवाहबंधनात अडकले. रणबीर कपूरच्या मुंबई येथील ‘वास्तू’ बंगल्यात हा सोहळा झाला. यावेळी बॉलीवूडसृष्टीतील तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या विवाहाच्या चर्चेला सोमवारपासूनच माध्यमांत आणि चाहत्यांमध्ये उधाण आले होते. आलिया आणि रणबीर यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनी या लग्नाविषयी मौन बाळगले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा मेंदी आणि संगीत समारंभासाठी उपस्थित झालेल्या नीतू कपूर आणि रणबीरची बहीण रिधिमा यांनी हा विवाह गुरुवारी, १४ एप्रिलला होणार असल्याचे जाहीर केले. बुधवारी रात्रीपासूनच समाजमाध्यमांवर या लग्नातील वऱ्हाडी मंडळींनी आपापली छायाचित्रे पोस्ट केली होती.  कपूर आणि भट्ट कुटुंबीय गुरुवारी सकाळीच रणबीरच्या बंगल्यात हजर झाले होते. करिना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, मावशी, वडील महेश भट्ट, आलियाच्या बहिणी पूजा भट्ट, शाहिन भट्ट, राहूल भट्ट, आकाश आणि श्लोका अंबानी, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अयान मुखर्जी, अमिताभ बच्चन आणि कुटुंबीय अशी अनेक नामवंत मंडळी बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडीच्या विवाह सोहळय़ासाठी आवर्जून उपस्थित होती.

प्रेमारंभ कधी?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांची ओळख अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर झाल्याचे सांगण्यात येते. आलियाने रणबीर आपल्याला फार आधीपासून आवडत होता हे जाहीर सांगितले होते. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे सूत जुळले.