बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा कायमच वैविध्यपूर्ण कथानकं असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो. आमिर खानचे बरेचसे चित्रपट हे प्रबोधन घडवणारे असतात, तर प्रत्येक चित्रपटात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि यातील प्रत्येक भूमिकेसाठी त्याने पुरेपूर मेहनत घेतली आहे. ‘दंगल’मधील महावीर सिंग फोगाट या भूमिकेसाठी अभिनेत्याने तब्बल २८ किलो वजन वाढवलं होतं, तर ‘गजनी’ चित्रपटातील शर्टलेस सीनसाठी फिटनेसकडे लक्ष देऊन सिक्स पॅक अॅप बनवले होते.
आमिर खान कायमच त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी मेहनत घेताना दिसतो आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. ‘एबीपी लाईव्ह सुमित’ ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘राख’ चित्रपटातील एक किस्सा सांगत म्हटलं, “‘राख’ चित्रपटात असे काही सीन आहेत, जिथे मी साकारत असलेल्या पात्राने घर सोडलेलं असतं आणि तो रस्त्यावर राहात असतो.”
“त्यामुळे त्या भूमिकेत शिरण्यासाठी आणि लोकांना मी खरंच बेघर आहे असं वाटावं म्हणून मी खऱ्या आयुष्यात काही दिवस अंघोळ केली नव्हती. जोवर चित्रपटातील त्या ट्रॅकचं चित्रीकरण सुरु होतं तोवर मी अंघोळ केली नव्हती.” पुढे आमिरने या मुलाखतीत त्याला ‘द परफेक्शनिस्ट’ असं संबोधलं जातं याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “लोक मला ‘द परफेक्शनिस्ट’ म्हणतात, पण मी स्वत:ला ‘परफेक्शनिस्ट’ समजत नाही. मला फक्त प्रत्येक गोष्ट निटनेटक्या पद्धतीने करायला आवडते.”
दरम्यान, आमिर खानने आजवर त्याच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत, तर त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा एक वेगळा फॅनबेस असलेला पाहायला मिळतो. शिवाय चित्रपटातील त्याच्या संवादावर अनेकदा मिम्स बनवले जातात तर काही प्रेक्षकांना त्याचे संवाद तोंडपाठ आहेत. अशातच आता अभिनेता लवकरच ‘सितारे जमीन पर’ या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. यासह आमिर सध्या त्याचं ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम करत आहे, त्यामुळे लवकरच तो एक भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.