Ananya Pandey bharatanatyam troll : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही ‘फॅशनिस्टा’ व ‘युथ आयकॉन’ म्हणून ओळखली जाते. तिचा ‘चांद मेरा दिल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विवेक सोनी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनन्याने चांदणी नावाचे पात्र साकारले आहे. सध्या याच भूमिकेतील अनन्या पांडेचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये अनन्याने नटराजाच्या मूर्तीसामोर सादर केलेल्या भरतनाट्यमवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या भरतनाट्यमवरून अनन्या पांडे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

अनन्याने सादर केले भरतनाट्यम

अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमी तिच्या लूक आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने सादर केलेल्या नृत्यामुळे नेटकऱ्यांनी अनन्यावर निशाणा साधला आहे. ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटामध्ये तिने भरतनाट्यम हे पारंपरिक नृत्य सादर केले आहे. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शास्त्रीय नृत्याची अदा आणि हावभाव दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल केले आहे.

नटराजाच्या मूर्तीवरदेखील आक्षेप

चित्रपटामध्ये ‘कॉलेज रियुनियन’ दाखवण्यात आले असून, त्यामध्ये अनन्या पारंपरिक नृत्य आणि हिप-हॉप यांचे फ्युजन सादर करताना दिसते. मात्र, तिने केलेल्या नृत्यावर प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये वापरण्यात आलेल्या नटराजाच्या मूर्तीवरदेखील आक्षेप घेतला आहे.

सोशल मीडियावर अनन्याचा व्हिडीओ शेअर करीत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, कोणीतरी अनन्या पांडेजी यांना थांबवा. तिने अजून भरतनाट्यमची विटंबना करण्याआधी थांबवा. नटराजाच्या मूर्तीसमोर अनन्याने असे नृत्य करण्याचे हे एक धाडसच केले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, अनन्या पांडेने शास्त्रीय भरतनाट्यमच्या २,००० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची पूर्णपणे चेष्टाच करून टाकली. या विचित्र प्रकारामुळे भविष्यात जर कोणी अनन्यावर केस दाखल केली, तर मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, भरतनाट्यमची सुरुवात इ.स. २०० मध्ये झाली आणि शेवट २०२६ मध्ये अनन्या पांडेने केला. तुझे भारतीय संस्कृतीशी काय वाकडे आहे की तू असे वागते? अशी टीका नेटकऱ्यांनी अनन्या पांडेवर केली आहे.

नव्या पिढीची ‘लव्ह स्टोरी’…

अनन्या पांडे आणि लक्ष लालवानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चांद मेरा दिल’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. नव्या पिढीचे प्रेम, त्यांच्या भावना आणि कौटुंबिक गोंधळ यांवर आधारित हा सिनेमा आहे. धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमामध्ये आस्था सिंग, प्रथम राठोड, आशीष दुबे, अंकुर पोद्दार व एल्विस जोस यांनी भूमिका साकारल्या आहेत.