अर्जुन कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. पण त्याने पोस्ट केल्या की ट्रोलर्स त्यावर वाईट कमेंट्स करून त्याला ट्रोल करतात. अर्जुन त्याचा अभिनय आणि फ्लॉप चित्रपटांमुळे ट्रोल होतो. या ट्रोलिंगचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय, असं त्याच्या अलिकडच्या पोस्टमधून दिसतंय.
अर्जुन कपूरच्या दिवंगत आईची जयंती होती. त्यानिमित्ताने अर्जुनने एक खूपच भावनिक पोस्ट केली. ही पोस्ट पाहून नेटकरी भावुक झाले.
“वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, आज तुझी खूप आठवण येतेय
अलीकडच्या काही काळापासून आयुष्य खूप कठीण, क्रूर झालंय, पण ठीक आहे…
मी आधीही हे सगळं सहन केलं आहे, मी ते पुन्हा सहन करेन आणि तरीही पुन्हा उभा राहीन… कारण तूच मला आयुष्याला सामोरं जायला, संयम आणि सन्मानाने लढायला शिकवले आहेस…
आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू, तू आणि मी
मी लवकरच तुला पुन्हा भेटेन आणि आपण एके दिवशी तुझा वाढदिवस एकत्र साजरा करू…
तुझा लाडका मुलगा
अर्जुन,” असं कॅप्शन अर्जुन कपूरने दिलं आहे.
अर्जुन कपूरची पोस्ट
अर्जुन कपूरच्या या भावनिक पोस्टवर बॉलीवूड सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. त्याची एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या कमेंटनेही लक्ष वेधून घेतलं आहे. जान्हवी कपूर, करीना कपूर खान, समय रैना, अपारशक्ती खुराना, खूशी कपूर, संजय कपूर, सोफी चौधरी, राहुल देव, जिनिलिया डिसुझा यांनी कमेंट्स केल्या आहेत. मलायका अरोराने कमेंट्समध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

अर्जुन कपूरच्या पोस्टवर सहसा नकारात्मक कमेंट्स येत असतात, पण यावेळी लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला. त्याच्या या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स कमी आहेत. आता काहीच बोलणार नाही, आज ट्रोल करणार नाही, अर्जुन काळजी घे, अशा कमेंट्स त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अर्जुन कपूर व मलायका अरोराचे ब्रेकअप
अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती आणि २०१९ मध्ये अर्जुनच्या वाढदिवसाला त्यांनी आपलं नातं सोशल मीडियावर अधिकृत केले होते. हे दोघे जवळपास ६ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा मे २०२४ पासून सुरू झाल्या होत्या, परंतु अर्जुन कपूरने अधिकृतपणे ऑक्टोबर २०२४ मध्ये यावर शिक्कामोर्तब केले. दोघांनीही हे नाते अत्यंत सन्मानपूर्वक संपवले असून ते एकमेकांचे मित्र आहेत. ब्रेकअपनंतर मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं की, “अर्जुन तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहील.”

