दिवंगत अभिनेते इरफान खान हे आजही त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जणू घरच केलं होतं. त्यामुळेच आज ते या जगात नसतानाही अजूनही प्रेक्षकांना त्यांचा विसर पडलेला नाही.
इरफान खान यांना जाऊन पाच वर्षं झाली आहेत. २९ एप्रिल २०२० साली त्यांचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. इरफान खान यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुलं, असं कुटुंब आहे. वडिलांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा मुलगा बाबिल खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. बाबिलनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक कविता केलेली आहे.
बाबिलने इरफान यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाबिल लहान असल्याचं दिसतं. तर, वडिलांबरोबरचा फोटो शेअर करीत त्यानं त्यांच्या आठवणीत इंग्रजीत कविता लिहिली आहे.
तुझ्यासवे, तुझ्याविणा.
आयुष्य पुढे जात आहे.
मी लवकरच तुझ्याबरोबर असेन.
आपण लवकरच भेटू, एकत्र हसू,
मी तुला घट्ट मिठी मारून पूर्वीसारखं रडेन
मला तुझी खूप आठवण येते.
असं म्हणत भावूक पोस्ट लिहिली आहे.
बाबिलसह इरफान यांचे सहकारी व ‘पिकू’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजित यांनीसुद्धा इरफान खान यांच्या आठवणीत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत लिहिलं आहे की, “प्रिय मित्रा मला माहीत आहे की, तू जिथे कुठे असशील तिथे सुखरूप असशील. तिकडेसुद्धा तू खूप मित्र बनवले असतील. पण तुला माहीत नाहीये की, इकडे लोक तुझी किती आठवण काढत असतात.”
पुढे इरफान यांच्या मुलांबद्दल बोलताना त्यांनी लिहिलं आहे, “मी बाबिलसह एक चित्रपट बनवला आहे. तो सुद्धा एक चांगला कलाकार म्हणून घडत आहे आणि इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची जागा निर्माण करू पाहत आहे. त्यामुळे मला तुला सांगायचं आहे की, बाबिल व अयान दोघांचंही सगळं नीट सुरू आहे.”
दरम्यान, इरफान खान यांचा मुलगा बाबिल ‘लॉगआऊट’ या चित्रपटात झळकला होता. त्याव्यतिरिक्त तो ‘द रेलवे मेन’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमध्ये दिसला होता. त्यामध्ये त्यच्यासह आर. माधवनदेखील पाहायला मिळाले होते. त्यासह तो जसलीन रॉयलच्या ‘दस्तूर’ या गाण्यामध्येही झळकला होता. आता तो त्याच्या एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.