बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. बॉलिवूड इंडस्ट्रीतील समस्यांवर त्या नेहमीच स्पष्ट बोलताना दिसतात. आपलं खासगी आयुष्य ते बॉलिवूडमधील संघर्ष या सगळ्यावरच त्यांनी याआधी भाष्य केलं आहे. त्यांचा ‘वध’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला फारसे यश मिळालेले नाही. याबाबत एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला आहे. नीना गुप्ता यांनी डीएनएला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या अपयशाबद्दल भाष्य केलं आहे. नवीन पिढीतील कलाकार प्रेक्षकांशी संपर्क साधण्यात अयशस्वी ठरले का, असे विचारल्यावर नीना गुप्ता यांनी उत्तर दिले, नाही, "अजिबात नाही. हा एक टप्पा आहे. करोनानंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी झाली आहे आणि लोकांकडे असलेले पैसेही कमी झाले आहेत. चित्रपटगृहात कुटुंबासह चित्रपट पाहणे महाग झाले आहे आणि अनेकांचे रोजगारदेखील गेले आहेत. त्यामुळे हा एक टप्पा आहे आणि शेवटी ठीक होईल. जे चित्रपट चांगले असतील ते बॉक्स ऑफिसवर चालतील आणि माझा दाक्षिणात्य चित्रपट विरुद्ध बॉलिवूडवर विश्वास नाही." “मी कास्टिंग डायरेक्टरला फोन केला अन्…” संतोष जुवेकरचा नव्या ‘हिंदी’ चित्रपटाबद्दल खुलासा वध चित्रपट निवडण्यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं, त्या असं म्हणाल्या, "मी पटकथा मनोरंजक आहे की नाही याचा विचार करून निवडत नाही किंवा ती कॉमेडी किंवा थ्रिलर आहे, मी अशा पटकथा स्वीकारते ज्या माझ्यासाठी मनोरंजक आहेत, माझ्या हृदयाला स्पर्श करतात, ज्याबद्दल मला आनंद होतो. मुख्य म्हणजे मी सकाळी उठल्यावर चित्रीकरणाला जाण्यासाठी उत्सुक असायला हवं, निराश झाल्यासारखं नाही किंवा चित्रीकरणाला जाण्यास भाग पाडल्यासारखं नाही. त्यामुळे सर्व काही त्यावर अवलंबून आहे." अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नीना गुप्ता अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. 'वध'च्या आधी त्या अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’बरोबरच नीना या ‘गुडबाय’ या चित्रपटातही झळकल्या होत्या.