गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या या सीरिजमधील पहिला भाग प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. चित्रपटाच्या कमाईवरुन बरेच वाद रंगले पण या चित्रपटाला लोकांनी पसंती दर्शवली. रणबीर-आलिया ही जोडीही लोकांना भावली.

बॉयकॉट ट्रेंड व्हायरल असतानाही या चित्रपटाने केलेली कामगिरी उत्तम आहे असं कित्येकांनी स्पष्ट केलं.यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचाही समावेश झाला आहे. एकूणच बॉयकॉट ट्रेंडबाबत आणि चित्रपटांवर होणाऱ्या परिणामाबद्दल रितेशने त्याचं मत मांडलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाने ४२५ कोटी इतकी कमाई जगभरात केली आहे. ‘केजीएफ २’ आणि ‘आरआरआर’नंतर बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा यावर्षातला पहिला सुपरहीट चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : Photos : हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ ठरला सुपरहीट; फ्लॉप होणाऱ्या हिंदी रिमेक चित्रपटांची साखळी मोडली

एका मध्यमाशी संवाद साधताना रितेश देशमुखने याविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे. रितेश म्हणाला, “जर चित्रपट चालत नसतील तर याला जबाबदार केवळ आपण कलाकार मंडळी आहोत. चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे फ्लॉप होत आहेत असं जर कुणाचं म्हणणं असेल तर ‘ब्रह्मास्त्र’सारखं मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. बॉयकॉट ट्रेंडचा सामना करूनही ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट ठरला आहे.”

‘लगान’शी तुलना करत रितेशने एक वेगळा मुद्दा मांडला. तो म्हणाला, “लगान चित्रपटात जसा शेवटी पाऊस कोसळतो तसंच काहीसं आपल्या चित्रपटक्षेत्रात घडलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या आधी चित्रपटक्षेत्रात चांगल्या कथांचा दुष्काळ पडला होता. ‘ब्रह्मास्त्र’ने ती कमतरता भरून काढली आहे. आपण या चित्रपटाचं यश साजरं करायला हवं.” रितेश देशमुखचा ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रितेशबरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल.