Esha Deol Bharat Takhtani Divorce : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलचा घटस्फोट झाला. २०२४ मध्ये ईशा व भरत तख्तांनी वेगळे झाले. ईशाला घटस्फोटानंतर एकटीने मुलींचा सांभाळ करण्याबद्दल विचारण्यात आलं. वेगळं व्हायचा निर्णय घेतला असला तरी समजुतदारपणे काही गोष्ट कराव्या लागतात ज्यामुळे कुटुंब एकत्र राहू शकेल, असं ईशाने सांगितलं.
मामाराझी या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ईशाला विचारण्यात आलं की, “सिंगल मदर असणं फायदेशीर आहे की त्याचे काही नुकसान आहेत?” यावर ईशा म्हणाली, “मी सिंगल मदर आहे, असा विचार करायला मला आवडत नाही. कारण मी नेहमी एका विशिष्ट पद्धतीने वागत नाही. खरं तर आयुष्यात कधीकधी काही गोष्टींमुळे भूमिका बदलतात आणि जर त्या एका विशिष्ट समीकरणात बसत नसतील, तर तुम्ही त्या स्वतःवर घेतल्या पाहिजे. खासकरून जेव्हा तुम्हाला मुलं असतील, तेव्हा दोन प्रौढ व्यक्तींनी यातून मुलांसाठी मार्ग काढायला पाहिजे. आणि हेच मी आणि भरत करतो.”
वेळापत्रक ठरवावं लागतं – ईशा देओल
काम आणि मुलींसाठी वेळ या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधतेस? असा प्रश्न ईशाला विचारण्यात आला. यावर काम करणाऱ्या महिलांनी टाइम मॅनेजमेंटची कला आत्मसात केली पाहिजे, कारण ती अत्यंत आवश्यक आहे, असं ईशाने नमूद केलं. “कारण त्याशिवाय गोष्टी सुरळीत होऊच शकत नाही. तुम्हाला तुमचं वेळापत्रक ठरवावं लागेल आणि ठरल्यानुसार गोष्टी झाल्या नाही तर त्यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते,” असं ती म्हणाली.
बाहेर जाणं टाळते ईशा
ईशा कधीकधी मुलींसाठी वेळ काढण्यासाठी एक महिना आधीच तिचे वेळापत्रक तयार करते. “समजा, जर मला एखाद्या दिवशी १० किंवा १२ तास शूटिंग करायचे असेल, तर मी माझ्या मुलींबरोबर किमान ४ तास घालवण्याचा प्रयत्न करते. सुट्टीच्या दिवशी, मी पूर्ण दिवस माझ्या मुलींबरोबर घालवते. मी त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करते, जेणेकरून मी त्यांच्याकडे १०० टक्के लक्ष देतेय याचं समाधान त्यांना वाटेल. मी माझ्या मित्रांना कमी भेटते, मी बाहेर जाणं टाळते, कारण यामुळेच मला काम करून मुलींना पुरेसा वेळ देतो येतो,” असं ईशा म्हणाली.
ईशा व भरत यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना राध्या व मिराया या दोन मुली आहेत. भरत व ईशा यांनी १२ वर्षांच्या संसारानंतर २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. सहमतीने वेगळं व्हायचा निर्णय घेतला असून मुलींचं संगोपन एकत्र करणार असं ते घटस्फोटाच्या निवेदनात म्हणाले होते.