Shahrukh Khan Katrina Kaif Film : बॉलीवूडमधील एका सुपरहिट चित्रपटाच्या रिलीजआधी दिग्दर्शकाचं निधन झालं होतं. हा त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याचबरोबर ५-१० नव्हे तर तब्बल २६ पुरस्कार जिंकले होते.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे ‘जब तक है जान’. २०१२ साली ‘जब तक है जान’ हा रोमँटिक लव्हस्टोरी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता आणि त्याची हिरोईन कतरिना कैफ होती. या चित्रपटात अनुष्का शर्मा सहाय्यक भूमिकेत दिसली होती. अनुपम खेर आणि ऋषी कपूरदेखील या चित्रपटात होते.

चित्रपटाची कथा

या चित्रपटात शाहरुख खानने लंडनमध्ये काम करणाऱ्या समर आनंद नावाची भूमिका केली होती. समर गायक असतो आणि लहान-मोठ्या नोकऱ्या करून जगत असतो. तिथे त्याची भेट मीरा थापरशी (कतरिना कैफ) होते. ती एक श्रीमंत बिझनेसवूमन असते आणि देवावर तिची श्रद्धा असते. समर व मीरा प्रेमात पडतात. पण एक अपघात होतो आणि मीरा शपथ घेते की समर बचावल्यावर ती त्याला कधीच भेटणार नाही. त्यानुसार ती समरपासून दूर निघून जाते, त्यानंतर कथेत एक ट्विस्ट येतो.

प्रेमभंग झाल्यावर समर भारतात परततो आणि भारतीय सैन्यात बॉम्ब डिस्पोझल एक्सपर्ट म्हणून काम करू लागतो. त्याला मरणाची भीती वाटत नाही. इथे त्याची भेट अकीरा राय (अनुष्का शर्मा) होते. ती डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असते आणि तिला समरवर चित्रपट बनवायचा असतो.

‘जब तक है जान’ बॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं होतं. या चित्रपटाची कथा, स्क्रीनप्ले, डायलॉग्स आदित्य चोप्रा यांनी लिहिले होते. हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवसांआधीच यश चोप्राचं निधन झालं. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. चोप्रांच्या निधनानंतर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.

शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ हा यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट ठरला होता. यश चोप्रा यांनी ८ वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटातून दिग्दर्शनात कमबॅक केलं होतं. शाहरुख खानने किसिंग सीन केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. कतरिना कैफ व किंग खानच्या लिपलॉक सीनची खूप चर्चा झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ‘जब तक है जान’ ने भारतात १२०.८५ कोटींचा व्यवसाय केला. जगभरात या चित्रपटाची एकूण कमाई २३५.६६ कोटी रुपये होती. ‘एक था टायगर’ आणि ‘दबंग 2’ नंतर हा वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होत. IMDb च्या मते, चित्रपटाने एकूण २६ पुरस्कार जिंकले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.