दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला. पण विजयच्याआधी ‘केजीएफ’ फेम अभिनेता यशला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण त्याने हा चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला. यशने हा चित्रपट नाकारल्यानंतर विजयलाही मोलाचा सल्ला दिला होता. याबाबतच आता नवी माहिती समोर आली आहे.

‘मिर्ची ९’च्या वृत्तानुसार दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांनी ‘लायगर’मध्ये यशने काम करावं म्हणून बरेच प्रयत्न केले. पण या चित्रपटाची कथा यशला पटली नाही. त्याने अगदी प्रामाणिकपणे हा चित्रपट करण्यास जगन्नाथ यांना नकार कळवला.

यशने हा चित्रपट करण्यास नकार कळवल्यानंतर विजयला जगन्नाथ पुरी यांनी ‘लायगर’साठी विचारलं. विजयने हा चित्रपट करण्यास लगेचच होकार कळवला. पण यादरम्यान विजयला यशने या चित्रपटाची कथा मला योग्य वाटली नसल्याचं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर प्रेक्षकही या कथेशी जोडले जाणार नाहीत असंही तो विजयला म्हणाला.

आणखी वाचा – Video : …अन् मृणाल कुलकर्णी यांच्या लेकाने चक्क ताज हॉटेलमध्ये बायकोला दिलं वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

यशने विजयला सगळं सांगूनही त्याने हा चित्रपट केला. अखेरीस ‘लायगर’चा सुपरफ्लॉप चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झाला. यानंतर जगन्नाथ यांनी ‘जन गण मन’ चित्रपटासाठी पुन्हा यशला विचारणा केली. पण हा चित्रपटही त्याने नाकारला. त्यानंतर ‘जन गण मन’साठी विजयला विचारणा झाली. यशने नाकारलेल्या या चित्रपटाला विजयने पुन्हा होकार कळवला. पण ‘लायगर’च्या अपयशानंतर ‘जन गण मन’ चित्रपट चित्रीत केला जाणार नसल्याचं बोललं जात आहे.