नवाजुद्दीन सिद्दिकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकताच नवाजुद्दीनचा ‘कोस्टाओ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नवाजुद्दीने नुकतीच एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे तो सध्या चर्चेत आला आहे.

नवाजुद्दीनचा ‘कास्टोओ’ हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला; तर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने पूजा तलवारसह संवाद साधला. यावेळी नवाजुद्दीनने बॉलीवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्याने म्हटलं आहे, “बॉलीवूडमध्ये चार-पाच वर्ष एकाच धाटणीचे चित्रपट बनवले जातात. जोवर प्रेक्षक बोअर होत नाहीत, तोपर्यंत हा प्रकार चालूच असतो. एखादा चित्रपट चालला की, तो चित्रपट चालला म्हणून पुढे लोक तसाच चित्रपट पुन्हा बनवतात; कारण त्यांना हा चित्रपटही चालेल असं वाटत असतं आणि याचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्यामुळे लोकांना हा एक फॉर्मुला वाटतो आणि मग सगळे हाच फॉर्मुला वापरतात.”

पुढे त्याने “अशातच आता मोठ्या प्रमाणात चित्रपटांचे सिक्वल काढले जात आहेत. इंडस्ट्रीमध्ये सर्जनशीलतेची कमी आहे. सुरुवातीपासून बॉलीवूडने चोरी केली आहे. पूर्वी गाण्यांची चोरी केली, नंतर कथानक चोरलं आणि आता यात भर म्हणून चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात सिक्वल काढले जात आहेत. सुरुवातीपासून इंडस्ट्रीमध्ये सर्जनशीलतेची कमतरता आहे.”

“चोर कधीच सर्जनशील नसतो. बॉलीवूडने साऊथच्या चित्रपटांचे कथानक, तिकडच्या चित्रपटातील गाजलेले सीन या सगळ्यांचा इकडे रिमेक केला आणि या गोष्टीला खूप हलक्यात घेतलं जातं.” पुढे नवाजुद्दीनने याच गोष्टींना वैतागून अनुराग कश्यपने बॉलीवूडला राम राम केल्याचं म्हटलं आहे. अनुराग कश्यपसह नवाजुद्दीने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’, ‘हड्डी’ आदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, नवाजुद्दीने आजवर ‘बदलापूर’, ‘लंचब्रेक’, ‘जग्गा जासूस’, ‘हाऊसफुल ४’, ‘ठाकरे’, ‘रईस’, ‘मुन्ना मायकल’, ‘मॉम’ यांसारख्या चित्रपाटंमध्ये महत्तवाच्या भूमिका साकारल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दिकीला ‘लंच ब्रेक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी ‘फिल्मफेअर पुरस्कार’, तर ‘बदलापूर’ चित्रपटासाठी नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ‘झी सिने’ पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. त्यामुळे नवाजुद्दीनच्या कामाचं कायमंच कौतुक होताना दिसलं.