Popular Actress removed from Movie: बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये परवीन बाबींचे नाव घेतले जाते. त्यांच्या अभिनयाची चर्चा आजही होताना दिसते. मात्र, त्यांच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते, तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीदेखील चर्चा होताना दिसते.
कबीर बेदी व परवीन बाबी रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा कबीर बेदींना परवीनच्या मानसिक आरोग्यामुळे त्यांची प्रकृती खाालवत आहे, असे जाणवले. तेव्हा त्यांनी परवीन बाबींना उपचार घेण्याबाबत सांगितले. मात्र, त्यांच्या आजाराबाबत इंडस्ट्रीला समजेल आणि त्यामुळे करिअरवर परिणाम होईल म्हणून परवीन बाबींनी उपचार घेण्यास नकार दिला आणि कबीर बेदींबरोबरचे नाते संपवले.
परवीन बाबींनी हे कपडे स्वत:जवळ…
ज्येष्ठ लेखक व चित्रपट इतिहासकार हनीफ झवेरी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘मेरी सहेली’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी परवीन बाबींचा एक किस्सा सांगितला. सुरुवातीला यश चोप्रांनी सिलसिला या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर परवीन बाबींना कास्ट केले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी काही कपडे तयार करून घेतले होते. परवीन बाबींनी हे कपडे स्वत:जवळ ठेवण्याचा आग्रह केला. त्यादरम्यान ‘कालियाँ’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.
परवीन बाबी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या. काश्मीरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी परवीन बाबी सिलसिला या चित्रपटासाठी जे कपडे तयार करून घेतले होते, ते त्या तिथे घेऊन गेल्या. एक दिवस सिनेमॅटोग्राफर प्रवीण भट्ट यांच्या खोलीत जाऊन त्यांना कपडे दाखवले. तसेच त्यांना सांगितले की, हे ‘सिलसिला’ या चित्रपटासाठीचे कपडे आहेत. प्रवीण भट्ट यांनी विचारले की, हे कपडे इथे का आणले आहेत. त्यावर परवीन बाबींनी उत्तर दिले की, मुंबईत या कपड्यांची चोरी झाली असती. त्यावेळी प्रवीण भट्ट यांना वाटले की, त्यांना काहीतरी मानसिक त्रास आहे.
पुढे हनीफ झवेरी म्हणाले की, त्यादरम्यानच एक घटना घडली. हॉटेलमध्ये प्रवीण व परवीन यांच्या खोल्यांमध्ये थोडेसे अंतर आहे. एके दिवशी प्रवीणला दिसले की, परवीन त्याच्या खोलीकडे रांगत येत आहे. हे पाहून प्रवीण यांना धक्का बसला. परवीन यांना वाटत होते की, जर त्या चालत आल्या, तर त्या पडतील. त्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत रांगत जात होत्या. त्यावेळी सर्वांना खात्री झाली की, परवीन बाबींना मानसिक आजार झाला आहे.
जेव्हा अमिताभ बच्चन ‘कालियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनाही जाणवलं की परवीन बाबी यांच्या वागण्यात काही बदल झाले आहेत. त्यांनी लगेच यश चोप्रांना फोन केला आणि काश्मीरमध्ये बोलावून घेतले. जेव्हा यश चोप्रा काश्मीरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी परवीन यांची परिस्थिती पाहिली.
परवीन यांचे गाल सुजले होते. सिलसिला या चित्रपटातील भूमिकेसाठी परवीन योग्य वाटत नव्हती. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यामुळेदेखील त्यांना चिंता वाटली. जर परवीन यांचा आजार वाढला, तर चित्रपटाचे शूटिंग थांबेल. त्यानंतर यश चोप्रा यांनी परवीन यांना सांगितले की, स्क्रिप्टमध्ये खूप बदल झाले आहेत. तुझी भूमिका छोटी झाली आहे आणि इतक्या छोट्या भूमिकेसाठी मी तुला घेऊ शकत नाही. तुझ्याबरोबर मी पुढचा चित्रपट करीन. परवीन यांना याचा धक्का बसला. चित्रपटातून बाहेर काढण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी हे सगळे केले आहे, ते जबाबदार आहेत, असे परवीन बाबींना वाटले, असा खुलासा हनीफ झवेरी यांनी केला.
दरम्यान, सिलसिला या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जया बच्चन व रेखा महत्त्वाच्या भूमिकांत दिसल्या. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले.