बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक वर्षं त्यांनी चित्रपट, नाटक या दोन्ही क्षेत्रात अतुलनीय असं योगदान दिलं आहे. अभिनयाच्या बाबतीत नसीरुद्दीन यांना अभिनयाचं विद्यापीठ मानलं जातं. याबरोबरच ते राजकीय आणि समाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. नसीरुद्दीन या गोष्टींवर अत्यंत परखड भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे किंवा बऱ्याचदा राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना ट्रोल केलं जातं. आपल्याकडे फार कमी कलाकार आहेत जे राजकीय भूमिका घेतात त्यापैकीच एक अभिनेते म्हणजे नसीरुद्दीन शाह. अर्थात या गोष्टीचा कलाकारांना बऱ्याचदा फटकाही बसतो. याबद्दलच नसीरुद्दीन यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांनी वक्तव्य केलं आहे. आणखी वाचा : शाहरुख खान 'पठाण'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा पत्रकार आणि युट्यूबर सिद्धार्थ कनन याच्याशी संवाद साधताना याबद्दल रत्ना पाठक शाह यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, "मी नसीर यांना बऱ्याचदा कोणतंही स्टेटमेंट देण्यापासून रोखते, काय माहीत सध्याच्या काळात कुणीही घराबाहेर येऊन थांबेल दगडफेक करायला. त्यामुळे सावध राहावंच लागतं." शिवाय एखादी भूमिका मांडल्याने मनोरंजनसृष्टीत काम मिळायचंही बंद होतं असाही आरोप रत्ना पाठक यांनी केला आहे. रत्ना पाठक शाह लवकरच 'कच्छ एक्सप्रेस' या चित्रपटातून गुजरातीमध्ये पदार्पण करणार आहेत. प्रेक्षक आणि त्या स्वतः त्यांच्या या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. याबरोबरच त्या आता आसमान भारद्वाज याच्या 'कुत्ते' या आगामी हिंदी चित्रपटातही दिसणार आहेत. यात अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.