Rohit Shetty Firing : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर रविवारी (१ फेब्रुवारी) पहाटे गोळीबार झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अशातच या घटनेबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना पुण्यात ताब्यात घेतल्यानंतर मुंबईत आणणार असून, त्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा सहकारी असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर आणि आरझू बिश्नोई या नावाच्या अकाउंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, “आम्ही चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत आणलं जात आहे. सध्या त्यांच्या पार्श्वभूमीबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.”

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्वजण वयाने वीसच्या आसपास असून, गोळीबारानंतर ते एका वाहनातून पुण्याकडे पळून गेल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा माग काढत पुण्यात त्यांना ताब्यात घेण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं. तसंच पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, रोहित शेट्टीने कोणत्याही गँगकडून धमकी मिळाल्याची तक्रार अद्याप केलेली नाही.

दरम्यान, ‘Shubham Lonker Aarzo Bishnoi’ नावाच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “राम राम, जय बजरंग बली. आम्ही शुभम लोणकर, आरझू बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन शांडू. मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतो. आम्ही त्याला अनेकदा आमच्या कामात हस्तक्षेप करू नका, असं सांगितलं.”

या पोस्टमध्ये पुढे असंही म्हटलं होतं की, हा फक्त इशारा असून ऐकलं नाही तर पुढच्या गोळ्या थेट छातीत घुसतील. तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीलाही धमकी देण्यात आली होती. “सुधरा, नाहीतर बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था होईल. ज्यांना आम्ही इशारा दिला आहे, त्यांनी सरळ रेषेत राहावं, नाहीतर लपण्याची जागा सुद्धा मिळणार नाही,” असा मजकूर पोस्टमध्ये होता. शेवटी, “एकच होता, एकच आहे आणि एकच राहणार – लॉरेन्स बिश्नोई ग्रुप,” असंही लिहिण्यात आलं होतं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही पोस्ट लॉरेन्स बिश्नोई गँगकडूनच करण्यात आल्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही अशाचप्रकारे सोशल मीडियावर पोस्ट टाकून लगेच डिलीट केली जाते आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल केला जातो, ज्यामुळे पोस्ट कुठून अपलोड झाली हे शोधणं अवघड होतं. पोलिसांनी हेही स्पष्ट केलं आहे की, गेल्या काही महिन्यांत बॉलीवूडमधील कोणाकडूनही बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची अधिकृत तक्रार मिळालेली नाही.