पतौडी कुटुंब हे बॉलीवूडमधील राजघराण्यांपैकी एक आहे. शर्मिला टागोर या ९० च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी भारतीय क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्यासह २७ डिसेंबर १९६८ रोजी लग्न केलं होतं. या दोघांची प्रेमकहाणी त्या काळी बरीच गाजली होती. त्यामुळे क्रिकेटर व अभिनेत्री, असं समीकरण असलेल्या प्रेमकहाण्या आपण पूर्वीपासून बघत आलो आहोत.

परंतु, शर्मिला टागोर व मन्सूर अली खान पतौडी यांची प्रेमकहाणी खूपच खास आहे. शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत मन्सूर अली खान पतौडी यांनी त्यांना हटके अंदाजात लग्नाची मागणी घातली होती याबद्दल सांगितलं आहे. ‘कपिल शर्मा’च्या मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी याबद्दल सांगितलं आहे. शर्मिला टागोर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर यावेळी अर्चना पूरन सिंह यांनी त्यांना, मन्सूर पतौडी यांनी तुम्हाला प्रपोज कसं केलं होतं याबद्दल विचारलं होतं.

त्यावर त्यांनी हा खूप गमतीशीर किस्सा असल्याचं म्हणत उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या, “आम्ही दोघे पॅरिसला गेलो होतो. त्यावेळी तिथे बेस्टील डे होता, जिथे लोक रस्त्यावर येऊन उत्साहात हा दिवस साजरा करतात. त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती. तेव्हा तिथेच त्यांनी फिल्मी पद्धतीनं गुडघ्यावर बसून मला, माझ्याशी लग्न करशील का, असं विचारलं होतं. परंतु, गर्दी खूप असल्यानं मला त्यांचा आवाज ऐकू आला नाही आणि मी त्यांना मला काहीच ऐकू आलं नाही, असं म्हटलं. तेव्हा त्यांनी पुन्हा मला, माझ्याशी लग्न करशील का, असं विचारलं आणि मी हो, असं उत्तर दिलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची पहिली भेट कोलकातामध्ये एका क्रिकेट पार्टीदरम्यान झाली होती. त्यावेळी शर्मिला टागोर भरपूर क्रिकेट बघायच्या. या पार्टीद्वारे दोघांची चांगली ओळख झाली होती. पुढे दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.