अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. कंगना आणि रंगोलीविरोधात २५ जानेवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नका असे आदेश कोर्टाने दिले आहेत. कंगना आणि रंगोलीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टाकडून कंगनाला दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे २५ जानेवारीपर्यंत कंगना आणि रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावू नयेत असेही आदेश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी कंगना व तिची बहीण रंगोली ८ जानेवारी रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे असे आरोप करत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

काय आहे प्रकरण?

देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे कंगनाविरोधात दाखल करण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना व रंगोली सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त झाल्या होत्या. मात्र, यापैकी कंगनाच्या एका ट्विटवर साहिल नामक व्यक्तीने आक्षेप घेत वांद्रे न्यायालयात कंगना आणि रंगोली विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कंगनावर देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांअंतर्गंत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना जबाब नोंदविण्यासाठी नोटीस पाठविली होती.