आज आपला भारत देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी लक्षणीय कार्य करत आपल्या देशवासीयांची मान अभिमानाने उंचावत आहेत. देशाप्रति आणि भारतीय लष्कराप्रति असलेला आदर प्रत्येकजण या ना त्या माध्यमातून व्यक्त करत आहे. तर काहीजण भारतीय सैन्यात भरती होण्याचीही सुप्त इच्छा व्यक्त करताना दिसतात. यात कलाकारही मागे नाहीत. मनोरंजन सृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांना भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. तशी संधीही त्यांच्याकडे चालून आली पण काही कारणाने ती त्यांना गमवायला लागली. जाणून घेऊया अशा पाच कलाकारांबद्दल जे आज कलाकार नसते तर आपल्याला लष्करात दिसले असते.

आणखी वाचा : मिस ‘पू’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार? करीनाने दिले संकेत

१. रणविजय सिंघा :

रणविजय सिंघा हे मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव आहे. त्याने जवळपास एक दशक रोडीज आणि स्प्लिट्सव्हिलाचे सूत्रसंचालन केले होते आणि आता तो वेब सिरिजमध्येही उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. तो सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल इक्बाल सिंग सिंघा यांचा मुलगा आहे आणि जेव्हा त्याने लष्कराची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा तो २० वर्षांचा होता. रणविजय सशस्त्र दलात सामील होण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता परंतु इतक्यात त्याला रोडीज या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याने ती निवडली.

२. चेतना पांडे :

अभिनेत्री चेतना पांडे रोहित शेट्टीच्या दिलवाले चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने काही रिअॅलिटी शो देखील केले होते. अलीकडील खतरों के खिलाडी १२ मधील तिच्या कार्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. उंच आणि सुंदर असलेल्या चेतनाच्या वडिलांची इच्छा होती की तिने सैन्यात भरती व्हावे. एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केलं होता.

३. वरुण सूद :

अभिनेता वरुण सूद याने अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने पाऊल टाकले आहे. आर्मीमध्ये सामील होण्याबद्दल बोलताना, त्याने ‘ई टाइम्स’ला सांगितले होते, “मी जेव्हा रोडीजमध्ये सामील झालो तेव्हा मला अगदी स्पष्टपणे समजले होते की अखेरीस मला आर्मीमध्ये सामील व्हायचे आहे, कारण माझे बाबा आर्मीत आहेत. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मला मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले पाहिजे असं वाटलं.  पण नियतीने मला वेगळा मार्ग स्वीकारायला लावला आणि मी अभिनय क्षेत्राचा एक भाग बनलो.”

हेही वाचा : आपला तिरंगा, आपला अभिमान… ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला कलाकारांचा पाठिंबा

४. क्रिश पाठक

क्रिश पाठक निखिल अडवाणीच्या ‘P.O.W बंदी युद्ध के’मध्ये दिसला होता आणि अभिनय ही त्याची पहिली पसंती नव्हती. ‘ई टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मला कधीच अभिनेता व्हायचे नव्हते पण माझ्यात ‘कीडा’ होता. मी लष्करी शाळेत होतो आणि मला सशस्त्र दलात जाऊन स्क्वाड्रन लीडर व्हायचे होते. पण काही कारणांमुळे मी ते करू शकलो नाही. नंतर मला आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी व्हायचे होते. मी परीक्षाही दिली पण शेवटी मला कळले की मला अभिनेता व्हायचे आहे आणि मी या क्षेत्रात आलो.

५. गुफी पेंटल

गुफी पेंटल यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारली होती. १९६२ साली जेव्हा ते इंजिनिरिंगचे शिक्षण घेत होते तेव्हा भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते. त्या वेळी त्यांच्या कॉलेजमधून भारतीय सैन्यात थेट भरती होण्याची त्यांना संधी चालून आली आणि गुफीने संधीचे सोने केले. पण नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच रचून ठेवले होते आणि ते एक कुशल अभिनेता बनले.