'पाहिले न मी तुला' मालिकेत काम करणारी मराठमोळी अभिनेत्री वर्षा दांदले यांच्या कार अपघात झाला आहे. भंडारदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला. तेव्हा पासून वर्षा या अंथरुणात आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दरम्यान, वर्षा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी केल्याचे सांगितले आहे. वर्षा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, 'बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजली. त्यानंतर त्यांनी वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली' असे यात म्हटले आहे. आणखी वाचा : ‘तो हात कुणाचा?’, नेटकऱ्यांनी शोधून काढली बिग बींच्या जाहिरातीमधील मोठी चूक पुढे त्या म्हणाल्या, 'त्यांनी तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम.' वर्षा यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अपघात कसा झाला याची माहिती दिली आहे. 'मी एका पुरस्कार सोहळ्याहून परत येत होते. माझ्यासोबत आणखी काही अभिनेत्री होत्या आणि आमच्या गाडीचा वेग नियंत्रणात होता. अचानक एक गाडी समोरुन आली आणि ती गाडी आमच्या गाडीवर येऊन आदळली. त्यानंतर काय झाले मला आठवत नाही. पण मला सगळ्यांचा आवज ऐकू येत होता. माझ्यासोबत असेल्या अभिनेत्रींना देखील दुखापत झाली होती' असे वर्षा म्हणाल्या.